Thursday, April 20, 2006

प्रसन्न सकाळ म्हण्जे काय तर आदल्या दिवसाचा सगळा शीण विसरायला लावणारी सकाळ!उठल्या उठल्या या प्रसन्नतेचा अनुभव घेतला.अहाहा!रात्री आजूबाजूचा परीसर दिसला नव्हता.आता मात्र एकेक नज़ारे पहायला मिळत होते.हॉटेलच्या मागच्याच भागात नदी वहात होती.मी टंगळमंगळ करेपर्यन्त दिनेश तिकडे फ़ेरफ़टका मारून आले होते.त्यांनी काही फ़ोटोही काढले होते.मग मी तयार होताच माझे एक फोटोसेशन झाले.:)सकाळी लवकरच निघायचे असल्याने न्याहरीची व्यवस्था हॉटेल करू शकले नाही पण चहा पिऊन आम्ही निघालो.तळेरे गाव येताच जरा पोटपूजा आटोपली.तिथे कोकम सरबत मागवले तर हे भल्या मोठ्या ग्लासात अगदी मधूर सरबत मिळाले.तृप्त होऊन निघालो.आता नापणे गाठयचे होते.नापण्याची ख्याति अशी की येथे एक धबधबा आहे की जो बारामहीने वाहतच असतो.कोकणाच्या आसपास असा प्रकार विरळाच म्हणावा लागेल.गोव्याचा दूधसागरही उन्हाळ्यात अगदीच कृश होतो.जसजसे पुढे जात होतो तसतसे जंगल थोडे विरळ होत चालले होते..मध्ये रस्त्यात विविध वाहनांशी रेसिंग चालूच होते.एका ट्रकवाला काही सईड देईना.बराच वेळ त्याच्या अगदी मागे मागे राहून ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला तर हा बाबा ऐनवेळेला गाडी उजव्या बाजूला घ्यायचा आणि आमचा प्रयत्न हाणून पाडायचा.पुढे येणार्या वळणार याला मागे टाकयचंच ठरवून आमच्या घोड्याला टाच मारली.वळणावर थोडी स्पेस मिळताच मी आमची दुचाकी दामटली आणि त्याला ओव्हरटेक करतांना चांगलाच दम भरला.तो काय हातवारे करतोय तिकडे ल़क्षही न देता.दुप्पट वेगाने गाडी दामटली.गगनबावड्याच्या दिशेने जातांना वैभववाडी लागले.तिथे नापण्याविषयी विचारले तर ते मागेच राहिले होते.पुन्हा मागे आलो तर पुन्हा रस्त्यात आमचा प्रिय ट्रकवाला समोरून येतांना दिसला.पुन्हा त्याच्या दिशेने बेफ़िकीरीने पहात आणि हॉर्न वाजवत मी सुसाट सुटलो.वैभववाडीच्या अलीकडे रेल्वे क्रॉसिंगच्या आधीच नापण्याला जाणारा फ़ाटा लागतो.तिकडे चौकशी करत करत नाप्ण्याच्या दिशेने निघालो.आता तर अजूनच वैराण दिसायला लागले.बारमाही धबधबा कुणाची तरी टवाळी असावी असं वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली.आणि अचानकच पुढ्यात काही मंडळी दिसू लागली.खालच्या दरीसारख्या भागातून पाण्याचा आवाज येत होता.त्यामुळे अगदी हायसं वाटलं.इथे झाडाच्या सावलीत मंडळी पत्त्यंचा डाव मांडून बसली होती.बरोबरीने 'आनंद'प्राशन चालू होते.मला असल्या लोकांची गंमत वाटते.या गोष्टी तर घरी बसूनही करता येतिल.मग उगाच मरमर करत एखाद्या निसर्गरम्य स्थळी येऊन पुन्हा तेच करत बसायचे.पुन्हा झाडा-पाना-फ़ुलांकडे वळूनही पहायचे नाही.जमल्यास 'झलक दिखलाजा' करत नाचायचे आणि तसेच कोरडेठाक राहून नाही नाही ती घाण तिथेच सोडून निघून जायचे.आम्ही आपला एक किंव करणारा कटाक्ष त्यांच्यावर टाकून धबधब्याकडे मोर्चा वळवला.पुढे जाऊन पहातो तर २५-३० फ़ूटांवरून पाणी उड्या घेत होते.जरा पुढे गेलं की पायथ्याशी उतरता येतं.तसंच खाली उतरलो.मी आपला लांबूनच निरीक्षण करत होतो.याआधी धबधब्यावरच्या दोन जीवघेणे प्रसंगांपासून मी पाण्यात उतरत नाही.आधीच पोहता येत नाही त्यात आगाऊपणा नको म्हणून मी काठाकाठानेच मजा घेत होतो.दिनेशना पाणी पाहिलं की उतरायचा मोह आवरत नाहीच.ते लगेच पाण्यात उतरले.मग मी पाण्याला वळसा घालून धबधब्याच्या अगदी खालीच पोचलो.तिथून वर चढून जायची तीव्र ईच्छा कशीबशी आवरली.तोपर्यन्त ऊन चंगलेच चटके देऊ लागले होते.पुढे निघायला हवे होते.गगनबावड्याचा गगनगिरी आश्रम आम्हाला खूणावत होता.तिथे जायला अर्धा पाऊण तास लागणार होता.ऊन मी म्हणत होते.आमचा घोडा पुन्हा भरधाव फ़ेकला.

4 comments:

Tulip said...

ghoda ka adalay tujha giri? lihi ki pudhach!

गिरिराज said...

malaa maahiitach navhatm kuNii vaaT pahaat asel!:)
lihito haLuu haLuu! aaLasa haa maaNasaachaa shatruu aahe! (aamhaa mulaannaa tyaachaa viShesh traas naahiich! ;)

Mints! said...

गिरी, बराचसा Blog आज वाचला तुझा, खुप चान लिहितोस. तुझ्या HG वरच्या सगळ्या कविता परत इकडे टाक.

गिरिराज said...

कोण बरे या मिन्टूबाई?:)
SG परंपरेप्रमाणे," धन्स मिन्टू!"