Wednesday, June 21, 2006

मनी मायबोलि (माझी मातृभाषा)

(गायत्रिचा ब्लॉग वाचतांना लक्ष्यात आलं की ही बया विविध बोलिंत लिहित सुटलिय.तिने माझ्या मातृभाषेत लिहायच्या आधीच मी लिहिणं अगदी गरजेचं आहे :) )

आपला राज्याना उत्तरेकडना जिल्हा म्हन्जे धुये,नन्दुरबार,जयगांव आनि नाशिकना उत्तर भाग याले 'खान्देश' म्हन्तस.गंज (खूप) वरीस तठे (तिथे)मुसलमानी राजे लोकेस्नं राज्य व्हतं त्यानालागे (त्यामुळे) 'खान देस' असं नाव पडनं.आते या भागमा बोलतंस ती बोली म्हन्जे 'अहिराणी' खरं तं 'ऐरानी' बोली!
तिच मनी (माझी) मातृभाषा. माय बोलस ती 'मायबोली'! आमनि माय आन बाप येरायेर (एकमेकांशी)ऐरानीमाच बोलतंस आनि भांडतसबी!
मना (माझ्या) मायआजीले ते (तर) ऐरानी सोडता दुसरी भाषा येये न्हई. कानले ऐकाले गोड वाटस (वाटते) ऐरानी.खान्देस म्हन्जे त्याले गुजरात,मध्ये परदेस जोगे (जवळ)शे (आहे)!त्यानलागे ऐरानीमा मारवाडी,गुजराती आनि हिन्दीना बराच शब्दे येल शेतस.्वाक्यरचाना हिन्दिसारखी र्हास!कोन म्हनस जुना जमानामां ह्या भागवर 'अहिर' राजानं राज्य होतं.. त्यानालागे ह्या भासाले (भाषेला) 'अहिराणी' नाव पडनं.कोन म्हनस,'ह्या भागमां तव्हंय (तेव्हा) राह्येत त्या लोकेसले (लोकांना) 'अव्हेरी' (अव्हेरून) टाकेल व्हतं आन म्हनून त्यास्नी भाशा म्हन्जे 'अहिराणि' ! आते जे बी कारण व्हई ते व्हई.बठ्ठा लोके हाई भाषा बोलतंस हे नख्खी!गावम्हदार (गावांमध्ये) मराठी बोलनराले एक ते 'मास्तर' म्हनतंस न्हई ते 'दीडशहाना'!तुम्हले म्हाईतीच शे (आहे) बहिणबाई ह्या जयगांव जिल्हाना व्ह्यत्या.त्यास्न्या कविता ऐरानीम्हदारच शेतस! हा,यक शे,त्या भागमा ऐरानी जास्त मराठीसारखी र्हास.पन धुया भागमां बोलतंस ती पिव्वर ऐरानी!
आते (आता) मी ऐरानीम्हदार लिखानां संकल्प सोडेल शे,ते काय काय लिखसू याय (वेळ) जमीं तसा आन सुची तसं!

Monday, June 5, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदीयाळी...

रजनीगंधाने या खेळात Tag करायला एक महीना उलटून गेला आणि पुस्तकांच्याबद्दल लिहायचे सारखे राहून जातेय.असेच होते... एखाद्या गोष्टीबद्दल खूप काही बोलायसारखे असले की ऐनवेळि शब्दच अपुरे पडतात किंवा सुचतच नाहीत! अगदी सहजच आठवायची म्हतलिइ तरी कितीक पुस्तकं डोळ्यासमोर येऊन जातात.एकाबद्दल लिहायचं म्हटलं तर दुसरं नक्कीच रुसणार!काही पुस्तकं एखाद्या शिक्षकाप्रमाणे भेटली,खूप काही शिकवून-समजावून गेली.काही अगदी सवंगड्याप्रमणे गळ्यात हात टाकत आपली गंमत सांगत राहिली.काही वेड्यासारख्या कथा सांगता सांगता हसवून गेली तर काही करूण-काव्य सांगताना रडवून गेली!काहींनी युद्धाच्या कथा सांगतांना अंगातळं रक्त सळाळून गेलं तर कधी त्यातलीच करुणा वाचून मन हेलावून गेलं.प्रत्येकाची वेगळी शैली,प्रत्येकाची वेगळी कथा आणि वेगळी तऱ्हा!
म्हणूनच एकाबद्दल लिहितांना दुसऱ्याला राग येणार तर नाही ना अशी भीती वाटते.पण नाही येणार त्यांना राग तसा.. आणि आलाच तर आपल्याच माणसाच्या रागाचे काय ईतके? एक हाक मारली तर गाल फ़ुगवून जवळ येतील आणि पुन्हा तोच प्रेमसंवाद चालू होईल.. तर.......

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
मी एका वेळी दोन तरी पुस्तके वाचत असतो त्यामुळे...
माणूस आणि झाड ले. निळू दामले आणि अवघाची शेजार- राणी दुर्वे

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
इथे एकाबद्दलच लिहितो:माणूस आणि झाड:जेमतेम नव्वद पानांचं हे पुस्तक.. मुखपृष्टापासुन मनात ठसतं.आपण पुस्तकात काय वाचणार आहोत हे सांगणारं इतकं सुन्दर मुखपृष्ट मला तरी दुसरं आठवत नाहिये सध्या!लहानपणापासून आपण इतकी झाडं पाहतो की ्त्यांच्याविषयी वेगळा विचार कधी होतच नाही.आई,बाबा,भावंड यांच्याविषयी आपण जितके आश्वासक असतो तितकेच या झाडांबद्दलही! त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याविशयी गप्पा मारायच्या राहूनच जातात! निळू दामलेंनी या सृष्टीची आपल्याला असलेली ओळख अधिक दृढ करून दिलीय या पुस्तकाद्वारे!इतकी की आपल्या गप्पा अजून रंगतील आता झाडांसोबतच्या!कुठेही काही वैज्ञानिक सिद्धांत माडतोय असला अभिनिवेष नाही की कठीण शब्दांचा अडसर नाही.झाडांबरोबरच्या आपल्या नात्याप्रमाणेच अगदी साधी सरळ ओघवती भाषा!एकाका मित्राची ओळख करून दिल्याप्रमाणे एकेका भागाचं सुंदर वर्णन आणि अलगद त्याच्या अंतरंगात डोकावणे.. इतकी सुंदर त्यांची भाषाशैली आहे.मी वर्नन करन बसण्यात अर्थ नाही.झाडासारख्या मित्राची नवीन ओळख करून देनारं हे पुस्तक स्वतःच अनुभवायची चीज़ आहे!

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१)म्रुत्यंजय-अगदि कुमारवयात वाचलेले हे पुस्तक नंतर अनेकदा वाचले.प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या कारणांनी आवदत गेले.वृषालीची कर्णाशी पहिली भेट तर कायम लक्षात राहिल अशीच आहे.शेवटच्या प्रकरणात अश्रू आवरणं अवघडच आहे.

२)राजा शिवछत्रपती-शिवचरित्रात हरवून गेलेल्या माणसाने लिहिलेले हे चरित्र आपल्याला वेड न लावेल तरच नवल!सर्व इतिहास माहीत असूनही प्रत्येकदा आणि पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा आणि शिवरायांबद्दल आदर,भक्ती,प्रेम पुनःपुन्हा वाढवणारा हा इतिहास तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही 'करंटे' आहात! आई भवानीला साकडं घालणारं पहिलं प्रकरण अंगावर अक्षरशः काटे आणतं!

३)स्मृतिचित्रे- एकासाध्या सरळ गृहिणीने तिच्या साध्या सरळ भाषेत सांगितलेली स्वतःची कथा!कधी गंमतिने हसवून तर कधी मन हेलावणऱ्या प्रसंगानी डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही!जगणं किती सोपं करता येतं हे शिकायचं असेल तर वाचायलाच पाहिजे हे पुस्तक!

४)तळ्यांतल्या साऊल्या- मी पुस्तकांबद्द्ल लिहितोय आणि कवितांबद्दल एक शब्दही नाही,हे होणे नाही. पुरुषोत्तम पाटील या माणसाचे दोनच काव्यसंग्रह आतापर्यन्त प्रसिद्ध आहेत,त्यातला हा पहिला!अगदी साध्या शब्दांतल्या आणि लयीतल्या त्यांच्या कविता कितिही वेळा वाचल्या तरी मन भरत नाही!त्यांच्या कविता वाचल्यावर उमताणऱ्या प्रतिक्रिया केवळ अश्याच असतात..... 'अशक्य लिहितो हा माणुस','महान','काय पण शब्द वापरतो हा माणुस'...
'ओठांशी थेंबला चन्द्राचा उद्गार,हातघाई झाला मदालस वार' असले लिहिणारा हा माणूस तितका प्रसिद्ध नाही याचे मात्र वाईट वाटते.पुन्हा इतक्याच कवितांवर तहान भागत नाही हेही खरेच!

५)लंपन ची पुस्तके: प्रकाश नारायण संत... चारच पुस्तकं लिहून मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण करणारा लेखक! लंपनचा खट्याळपणा,त्याला होणारे निरनिराळे भास,त्याचं भावविश्व.. सगळं वाचून आपल्याही घश्यात काहीतरिच होऊ लागतं,हेच या लेखनाचं यश.यातली 'शारदा संगित' ही कथा तर वेड लावते मला!तुम्हीही वाचून वेडे व्हाच!

कितिक पुस्तकं समोर उभी राहून 'माझ्याविषयी लिही ना रे!' म्हणुन मागे लागली आहेत.पुलंचा सगळाच 'गोतावळा' आवडतो.वपुंची 'महोत्सव,तू भ्रमत आहासी वाया,ही वाट एकटीची,अशी अनेक पुस्तकं आहेत.अजूनही उल्लेखनिय म्हणजे प्रतिभा रानडे यांचं 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'!विविध विषयांवर एका विदुषीशी मारलेल्या गप्पा किती काय देऊन जातात.

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१)समिधा-साधना आमटे
२)गोईण-राणी बंग
३)शाळा-मिलिंद बोकील
४)समग्र मीना प्रभू
५)संभाजी-विश्वास पाटील

५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
पूर्वी लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत राणी दुर्वे यांचं एक सदर येत असे,'शेजार' म्हणून!त्यातिल लेखांचं संकलन असलेलं पुस्तक म्हणजेच 'अवघाची शेजार'! कोनत्याही पानापासून कसेही वाचत रहावे आणि नवल करावे या विविध शेजारांचे आणि ते अनुभवणाऱ्या राणी दुर्वे यांचे! माणसांची आवड,नवनव्या अनुभवांची आवड,ट्रेकींगची आवड,कवितांची आवड या समान धाग्यांमुळे त्यांनी लिहिलेलं मनात अलगद उतरतं!शेजार इतका मर्यादित canvas घेऊन किती सूदर चित्र रेखाटावं!एकेक शेजार म्हनजे एकेक समृद्ध अनुभव आहे यातला! मग ती ग्लोरीया असो की बिळातले शास्त्रिबुवा,गचागच भरलेला लेडिज डाब्यातला अडाणी बायकांचा शेजार असो की अजून कुणाचा.. असा रंगतो हा शेजार की बस्स!त्यांचं लेखन मला शांता शेळके,अरुणा ढेरे यांच्या घराण्यातलं वाटतं... जीवनावर भरभरून प्रेम करणारं आणि तितक्याच त्रयस्थपणे त्याकडे पाहणारं!
गंमत अशी की खूप जणांना या पुस्तकाविष्यी माहीत नाही असं दिसलं.पण आता माहीत झालं आहेच तर एकदा डोकावून पहा या 'शेजारात' आणि त्यातलेच होऊन जा!

Thursday, June 1, 2006

हमे तुमसे प्यार कितना…


वसंताच्या आगमनाबरोबर कोवळी लुसलुशीत पानं दिसू लागतात,सृष्टीचं रुपडंच बदलून जातं. अश्याच वसंतातल्या एका सकाळी तीच पालवी थोड्या वेगळ्याच रुपात येते.कोवळी प्रेमभावना कुठून,कशी आणि अगदी नकळत मनात उमलत जाते.असं कसं हे प्रेम,नीट उमजतही नाही आणि सुटतही नाही.व्यक्त करावं म्हंटलं तर तेही नाहीच! तिच्याशिवाय काहीच दिसत नाही पण तिच्यापर्यंत पोचवताही येत नाही.कधी उन्हाचा कहर तर कधी जीवाची घालमेल करणारा उकाडा! असाच उन्हाळा येतो.असाच जीव बेचैन होत राहतो.आणि अचानकच आकाश भरून जातं,्निळशार आकाश अगदी काळंकुट्ट होऊन जातं.मग तर बेचैनी विचारूच नका! काय कारावं हेही सुचत नाही. मग गडगडाट होऊन सगळं आभाळ वाहून जातं.प्रेम मोजता येत नाहीच.पण किती प्रेम आहे तिच्यावर हे कस्ं सांगणार?आणि मग मनातलं मळभ असंच दूर होतं.... प्रेम का अस्ं मोजता येतं?मग? नाही माहीत प्रिये,किती प्रेम आहे माझं,पण एक मात्र खरंय.. तुझ्याशिवाय जगणं नाहीच असू शकत.

हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


गहिऱ्या बासरीच्या स्वरांनन्तर ऐकू येतो किशोरचा जादूई स्वर!अगदी मुलायम आवाजात किशोर गायला लागतो आणि एका बेचैन आणि कोवळ्या प्रेमाची कथा उमलू लागते.किती खरंय नाही.. प्रेमाला कोणतं परिमाण लावणार?ते का असं मोजता येतं?ते असंच असतं.. अचानक कोसळणाऱ्या पावसासारखं! तेच सांगू जाणे.. तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे प्रिये!

कुणी असतिल असे जे प्रेमात वर्षानुवर्ष झुरत आहेत,प्रियेची वाट पहात असतिल! पण माझ्याने हे कसं बरं सहन व्हावं.

सुना गम जुदाई का उठाते है लोग
जाने ज़िन्दगी कैसे बिताते है लोग
दिन भी यहाँ तो लगे बरस के समान


सारं आयुष्य विरहात काढणारे कुणी और असतिल.. मला तर एकेक दिवस वर्षांपेक्षाही मोठा वाटतो.
प्रेमविव्हल प्रियकारचं हृदयच किशोरने आपल्या समोर उघडून दाखवलंय!
य कडव्याच्या आधी येणारं संगीत तर काय वर्णावं! वायोलिनचा आर्त स्वर,गिटारीचा हृदयाचे तार अन तार हलवणारा स्वर आणि तबल्यावर निघणारे दोलायमान मनाचे तरंग.. पुढच्या शब्दांची जादू आधीच घेऊन येतात.
प्रेमात मी किती वाट पाहू शकेन हे माहीत नाही मला ,पण एक मात्र निश्चित आहे

हमे इंतज़ार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


ही तर झाली प्रियकराची स्थिति! पण तिचं काय? तिला या प्रेमाचा थांगपत्ता आहे की नाही?
काहिही काय? असं कसं होईल...
आर्त प्रेमाची ही हाक तिला ऐकू न यायला तिचं हृदय दगडाचच हवं.मग? काय आहे तिच्या मनात?

तिचंही उत्तर आहेच की! तिचही प्रेम आहेच की.. आपले महाशय प्रेमात आज पागल झाले आहेत.. पण तिच्या मनात हा प्रेमभाव कधीच जागृत झालाय.. महाशयांना काही कळायच्या आधीच...

मै तो सदासे तुम्हरी दिवानी,
भूल गये सैंया प्रीत पुरानी,
कदर न जानी कदर न जानी


परविन सुलताना! नावंच पुरेसं आहे. एका तरल आवाजाचं मुर्तिमंत प्रतिक! त्या गातात तो मुखडा तोच आहे(गीत वेगळंच असलं तरी),पण त्यातला अंदाज़ काय वर्णावा! यातल्या ‚प्यार’ या शब्दावर जी काय करामत केलीय त्यांनी.. अहाहा! आणि ॑मगर जी नही सकते’ मधल्या ‚॑बिना’ वर तर काय कलाकुसर केलिय! त्यांनी उलगडुन दाखवलंय प्रेयसीचं मन!
मै तो सदासे तुम्हरी दिवानी...
तुला कधीच नाही कारे कळलं?तूच बहुदा विसरुन गेला आहेस ही जन्मांतरीची प्रीत. माझ्या प्रेमाची तुला कधी किंमतच नव्हती जणू!
अहाहा! इकडे तो झुरतोय प्रेमात,कळत नाहिये कसं व्यक्त करावं हे प्रेम आणि ती तर जन्मांतरीच्या प्रेमाची साद घालते आहे. काय म्हणावं अश्या मधुर प्रेमाला? अस्ं वाटत्ं की आपणच जाऊन सांगावं की बाबांनो,का झुरताय असे विरहात? दोघेही तितकेच तर व्याकूळ आहात एकमेकांसाठी! पण ते सोडून देऊयात या गाण्यावरच...

पुन्हा एकदा किशोरच्या गाण्याकडे आपोआपच माझं मन वळतं.अगदीच कोमल प्रेम ,तितकंच हळवं! मग त्यात possessiveness असणारच! त्यात गैर असं काहीच नाही.पण महाशयां्नी अगदीच सीमा गाठली आहे म्हणावं लागेल...

तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल
बडी मुश्किलों से फ़िर संभलता है दिल


प्रेमात वाटेकरी नको हे ठिकच! पण तुला दुसऱ्या कुणी बघणंही मला जाळत जातं.काय करू मी?मनाला आवर घालूनही सावरायला वेळच लागतो.तुझ्या आठवणीतही मला वाटेकरी नकोय. तुझ्या काय काय गोष्टी लक्षात आहे म्हणून सांगू?तुझं हसणं,बोलणं,बोलतांना मध्येच तिरकी मान करून बघत राहणं आणि काय काय! वेडाच झालोय म्हण ना मी तुझ्या प्रेमात!ही बेचैनी नाही मला सांगता येणार....

क्या क्या जतन करते है तुम्हे क्या पता
ये दिल बेकरार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


पण तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच अशक्य आहे! तिचा आवाज ऐकाव तर केवळ मीच,तिला पहावं तर फ़क्त मीच,ती फ़क्त माझीच असावी! अगदी विचारातही तिच्या प्रेमात मला वाटेकरी नकोय!
हेही प्रेमाचं एक रुप!
आता आपल्याला कळलंच आहे की तीही तितकीच प्रेमात आहे तर तिचीही मनःस्थिति पाहूयात की जरा...

कोई जो डारे तुमपे नयनवाँ
देखा न जाये मोसे सजनवाँ
जले मोरा मनवा जले मोरा मनवा


त्याच्या प्रेमात passion आहे तर ती थोडी अधिक मनाच्या पातळीवर दिसतेय.पण तिलाही कुठे सहन होतय त्याला कुणी पाहणं?कुणी त्याच्याशी हसून बोलत असली तरी हिचा जीव खालीवर होतो.
परविन सुलताना! मी खरं तर त्यांचं version ऐकून काही वर्षं लोटली आहेत.तसं ते मी ऐकलही खूप उशीराच.आणि आश्चर्य वाटत राहिलं,अरे हे इतकं सुंदर गीत आपण पूर्वी कसं बरं नव्हतं ऐकलं?पण बरंच झालं म्हणायचं. वयाच्या टप्प्यावर थोडि ऊशीराच भेटलेली गाणी असोत की माणसं... खूपच लक्षात राहतात... आणि आवडून गेली तर विचारूच नका! त्यामुळेच आज काही वर्षांनंतरही मला त्या गाण्यातले त्यांचे शब्दनशब्द,सूर अन सूर कानात घुमाताहेत! ’जले मोरा मनवा’ यात दोनदा येतं.पहिला वरचा सूर आणि नंतरचा खाली अलगद येणारा स्वर... अहाहा! टीपेला पोचलेला झोका तितक्याच नैसर्गिकतेने,सहजतेने खाली यावा तसा भास होतो हे ऐकतांना!
खरं तर ही दोन्ही व्हर्जन्स चित्रपटात वेगवेगळ्या वेळेला येतात.पण केवळ गीत म्हणून ऐकतांना मला त्यांचा परस्परांतला संबंध नेहेमीच जाणवतो.
भारतिय अभिजात संगिताशी सलगी साधणारं परविन सुल्ताना यांचं व्हर्जन असो की हृदयाला भिडणारं किशोरचं व्हर्जन,त्यामागे जादुगारी एकाच माणसाची.. RD! वेडं करतो खरं तर हा माणूस.. आपण किती वेळा त्याला दाद देणार? बस्स! त्याने संगितातून घोळवून काढलेली गाणी ऐकत रहावं आणि म्हणत रहावं ’सलाम RD!’

मजरूह सुलतानपुरींनी दोन्ही गीतं शब्दबद्ध केलीय.अगदी साध्या सोप्या शब्दांत खूप काही मांडून जाणं हाच मजरूह यांच्या गीतांतला स्थायीभाव!म्हणूनच तर नूतनसाठी
’चाँद फ़िर निकला मगर तुम ना आये
जला फ़िर मेरा दिल,करू क्या मै हाये’
लिहिणारे मजरूह आमिर खानसाठी ’्पापा कहते है’ लिहू शकतात आणि ट्विंकल- सलमानसाठी
’बाहों के दरमियाँ’ लिहू शकतात!
प्रियकराची अगतिकता आणि प्रेयसीचा अनुराग,दोन्ही एकाच मुखड्याच्या गीतांत उतरवतांना किती वेगवेगळे भाव ओतले आहेत!
किशोरबद्दल तर बोलावं तितक्ं थोडंच आहे! त्याच्या मर्यादांवर बोट ठेवणारेही त्याच्या तितक्याच प्रेमात असतात जितके की त्याचे die hard Fans!

प्रेमाचा अनुभव घेतल्याशिवाय नाहीच लिहू शकत हे गीत,नाहीच येऊ शकत याचे स्वर तितके मनातून! आणि अशीच वेळ असेल तीही... भुरभूर पावसाची.. तिच्या प्रेमात झुरण्याची... तिने आतून ’ओ’ देण्याची आणि हुरहुर लावणाऱ्या तिच्या उत्तराची!

उगाच हे गीत ऐकून मन हळवं होतं... उगाच कुणासाठी तरी झुरावसं वाटू लागतं... आणि झिरमिर पावसाच्या साथीनं म्हणावसं वाटतं...

... मगर जी नही सकते तुम्हारे बिना!

(मी स्वतःला संगितातला जाणकार समजत नाही.त्यामुळे ही काही गीताची समीक्षा नाही.एका दाद द्याव्याश्या वाटणाऱ्या ,आतून आनंद देणाऱ्या गाण्यातला आनंद सगळ्यांबरोबर वाटून घ्यावासा वाटला म्हणुन हा प्रपंच!)

गिरीराज