Wednesday, August 27, 2008

कवितांच्या खो-खो मध्ये प्रियाने पाठीत धापाटा मारून खो घालावा तसे अगदी ’लिहिणार असशील तरच खो देते ’ म्हणत मला लिहिण्यास उद्युक्त केले आहे. आवडत्या कविताच लिहायच्या असल्याने आणि नियम क्र. ४ नुसार काही ’सपष्टीकरण’ द्यायची गरज नसल्याने जरा आलस बाजूला सारतोय. :)

१. माळ ओसरे

हिरव्या माळापुढे निळा गिरि

गिरवित काळी वळणे काही

छप्पर झाले लाल अधिकच

धूर दरीतून चढतच नाही

पुसून गेले गगन खोलवर

कांठावरती ढग थोडासा;

थोडासा पण तीच हेळणा:

पिवळा झाला फक्त कवडसा.

हिरव्या माळापुढे निळा गिरि

मावत नाही इतुका फिक्कट;

झुकत चालली पुढेंच टिटवी

माळ ओसरे मागे चौपट.

२. शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,

भरे निली नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली

भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,

गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,

भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे

शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.

दोन्ही कविता: आरती प्रभू

संग्रह:जोगावा

आता खो कुणाला द्यावा बरे? हं... सापडली मिनोती :)

No comments: