Wednesday, August 27, 2008

कवितांच्या खो-खो मध्ये प्रियाने पाठीत धापाटा मारून खो घालावा तसे अगदी ’लिहिणार असशील तरच खो देते ’ म्हणत मला लिहिण्यास उद्युक्त केले आहे. आवडत्या कविताच लिहायच्या असल्याने आणि नियम क्र. ४ नुसार काही ’सपष्टीकरण’ द्यायची गरज नसल्याने जरा आलस बाजूला सारतोय. :)

१. माळ ओसरे

हिरव्या माळापुढे निळा गिरि

गिरवित काळी वळणे काही

छप्पर झाले लाल अधिकच

धूर दरीतून चढतच नाही

पुसून गेले गगन खोलवर

कांठावरती ढग थोडासा;

थोडासा पण तीच हेळणा:

पिवळा झाला फक्त कवडसा.

हिरव्या माळापुढे निळा गिरि

मावत नाही इतुका फिक्कट;

झुकत चालली पुढेंच टिटवी

माळ ओसरे मागे चौपट.

२. शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,

भरे निली नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली

भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,

गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,

भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे

शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.

दोन्ही कविता: आरती प्रभू

संग्रह:जोगावा

आता खो कुणाला द्यावा बरे? हं... सापडली मिनोती :)

Monday, August 11, 2008

सलाम अभिनव बिंद्राला!!!

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच
बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर
कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे
बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले
इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक
सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.
श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी
प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. चीनच्या गतविजेत्या आणि यावेळेच्या रजतपदक विजेत्या झू
किनान च्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. क्षण आला अभिनव बिंद्राच्या पदक प्रदानाचा! पण पठ्ठ्या
अगदी शांत आणि संयमी निघाला. ज्या अविचलतेने त्याने शेवटचा शॉट घेतला त्याच शांतपणे त्याने
पदकाचा स्वीकार केला. आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू
झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू
लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!
आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले
होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही
कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न
करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही! जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक
मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा
वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते. आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना
तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील. सलाम अभिनव बिंद्राला!