Saturday, August 5, 2006

आये तुम याद मुझे...

काल किशोर कुमारचा जन्मदिवस होता.भारतिय हृदयाचा एक कोपरा कायम व्यापणाऱ्या काही निवडक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किशोर कुमार!'किशोर' इतकंच त्याला म्हणता येतं.उगीच कोणत्याही प्रकारचे आदरार्थी विशेषणं त्याला लावायची गरज नाही इतका किशोर आपला वाटतो.विविध दूरचित्रवाणि वाहिन्यांनी काल विविध कार्यक्रम सादर केलेच पण केक कापून जणू किशोर आजही आपल्यातच आहे असा उत्सव साजरा केला.आणि ते काही खोटंही नाही.आयुष्याच्या कोणत्याही वळणावर किशोरचं एखादं गीत आपली साथ करतच असतं.मग प्रसंग आनंदाचा असो,दुःखाचा असो किंवा कोणत्याही भावनेने अलिप्त असा असो.. किशोरचं गीत आठवतंच आपल्याला!पण आज मला आठवतंय त्याचंच एक गीत,'मिली' चित्रपटात अमिताभसाठी गायलेलं.. आये तुम याद मुझे.......

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन

काल सारखं हेच गीत का ओठी येत होतं कळेना.. अगदी जड आणि दर्दभऱ्या आवाजात किशोर गातो.. अमिताभ येरझऱ्या घालत गात असतांना दिसतो पडद्यावर.

जिसपल नैनों मे सपना तेरा आये
उसपल मौसम पर मेहन्दी रच जाये
और तू बन जाये जैसे दुल्हन

कवी योगेश यांची एक सुंदर कविता,साधी पण आशयगर्भ शब्दरचना आणि सचिनदेव बर्मन यांचे संगित; या सगळ्यांवर कळस म्हणजे किशोरचा आवाज़!

जब मै रातों मे तारे गिनता हूं
और तेरे कदमों की आहट सुनता हूं
लगे मुझे हर तारा ,तेरा दर्पण

सुरवातिला गोड आणि रोमॅन्टीक गाणीच किशोरच्या वाट्याला आली होति.पण पुढे जेव्हा अशी दर्दभरी गाणी त्याला मिळाली तेव्हा किशोर काय चीज़ आहे हे जगाला कळून चुकले.असंच एक 'मंज़िले अपनी जगह' किंवा 'मेरा जीवन कोरा कागज़' कायम गुणगुणायला लावणारं!

हरपल मन मेरा मुझसे कहता है
जिसकी धुन मे तू खोया रहता है
भर दे फूलोंसे उसका दामन

या गाण्यातल्या प्रत्येक कडव्याची सुरवात काहिश्या निराशेने होते.आणि मग तिसरी ओळ येते तेव्हा एका स्वप्नजगतात नेणारा आशावाद प्रतित होतो.'जब मै रातों मे..' म्हणतांनाचा किशोरचा आवाज आणि शेवटी 'लगे मुझे हर तारा,तेरा दर्पण' म्हणतांना प्रत्येक भावना जगणारा किशोरचा आवाज, जादूई आहे हेच पुन्हा प्रतित होते.गायनातले कोणत्याही प्रकारचे formal शिक्षण न घेतलेला किशोर हे जे करतो त्याला दैवी देणगीच म्हणावे लागेल.किशोरच्या आवाजातली जादू अनुभवायची असेल तर याराना चित्रपटातली दोन गाणी आवर्जून ऐकावीत.खरं तर दोन्ही गाणी पडद्यावर साकारली आहेत पुन्हा अमिताभनेच!पहिलं गीत आहे अतिशय हळूवार प्रेमगीत..."छूकर मेरे मनको"... यातला 'छूकर' कितीतरी हळूवारपणे स्पर्शून जातो.आणि हे गाणं संपत नाही तोच दुसरं गाणं सुरू होतं ते म्हणजे 'सारा ज़माना'! दोन्ही गाण्यांतला ज़मीन आसमानाचा फ़रक किशोरच्या आवाजातून किती अधोरेखित होतो!वाटतं,हळूवारपणे स्पर्शून जाणारा हाच का तो किशोर जो अगदी टपोरी ढंगात 'सारा ज़माना' म्हणतोय!

किशोरचा स्पर्श झालेली कितीतरी गाणी नुसति ऐकत रहावसं वाटतं.सहज आठवायचं म्हटलं तरी कितीतरी गाणी मनातून सरळ ओठांवर येतात.जादूच म्हणावी लागेल ही किशोरची!आज किशोर नसला तरी तितक्याच उत्साहात त्याचा जन्मदिन साजरा होतोय.पुढेही होतच राहील.पण त्याची आठवण देणारं हेच गीत पुन्हा त्याच्यासाठीच अर्पण...

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन!