Wednesday, December 20, 2006

यार ने कैसी रिहाई दी है....

एकच एक माणूस तुम्हाला कधी खूप वेगवेगळ्या रुपात भेटलंय का?मला माणूस नाही पण गुलज़ारचे एकाच गज़लेतले दोन शेर खूपदा वेगेवेगळ्या पद्धतिने आणि वेगवेगळ्या रुपात खूपदा भेटले आहेत. प्रत्येक वेळी त्यांचा संदर्भ अगदी आसपासच्या उदाहरणाशी जोडून आला आणि अगदी थक्क व्हायला झालं;प्रत्येकदा!!

जिसकी आँखों मे कटी थी सदीयाँ
उसने सदीयों की जुदाई दी है!

एकाच शब्दाला फ़िरवून अर्थ बदलून टाकण्याची गुलज़ारची हातोटी यातही बघायला मिळते.कुणाची तरी वाट पहात रहावं आणि त्याने कधी येऊच नये... म्हणाल तर तो प्रियकर असेल,प्रेयसी असेल,विकासाचा किंवा आशेचा किरण असेल.... डोळ्यांत प्राण आणून वाट पहात रहावं.. वेळही कळू नये किती गेला या वाट पाहण्यांत आणि येणाऱ्याने येऊच नये.......
-----------------------------------------------------------------------------------------------

दुसरा शेर तर खूपदा भेटतो.. प्रत्येक वेळी हसून निघून जातो....

फ़िर वही लौट के जाना होगा,
यार ने कैसी रिहाई दी है....

बघा आठवून असे कित्येक प्रसंग असतिल... तेव्हा वाटतंच वाटतं..

यार ने कैसी रिहाई दी है......

Thursday, November 23, 2006

सध्या मला अगदी पोटभरुन कंटाळा आलाय.अश्या वेळी काहीही करायचे म्हटले तरी त्याचाही जाम कंटाळा येतो.पिक्चर बघायचाही कंटाळा येतो,पुस्तक वाचायचाही कंटाळा येतो;अगदी जेवायचाही कंटाळा येतो.पण आता घरी असल्याने जेवावे लागतेच.. नाहीतर आई तिची धमकी खरी करून दाखवू शकण्याची भीती असतेचे-माझ्यामुळे वाया जाणारा स्वयंपाक माझ्या डोक्याला चोपडून देईन म्हणते.... अश्या कंटाळ्यात काय करायचे म्हणुन मी खूप दिवसांपासून ढुंकूनही न पाहीलेला माझा हा blog लिहायचा प्रयत्न करतोय.मागच्या २ तासांत मी एक ओळ लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि ती तशीच अर्धवट सोडून इकडे वळलो.आता मला किमान आठवडाभर तरी सुटी घ्याविशी वाटतेय आणि मस्तपैकी दुचाकीवरून भटकावेसे वाटतेय.पण जर सुटी घेऊन घरी राहिलो तर मला घरातली अतिशय फ़ुटकळ काम मह्त्वाची म्हणुन मला करायला लावली जातील.त्यात लेटर बॉक्स भिंतीवर लावणे हे अतिशय अवघड कामही मला करावे लागू शकते.त्यापेक्षा सुटीमध्ये पळून जाणे किंवा सुटीच न घेणे हे उपाय आहेत.सध्या तरी सुटी न घेणे चालू आहे.पुढच्या महीन्यात पळून जाणे हा उपाय अंमलात आणता येतो का हे पहावे लागेल.सध्या पळून जाता येईल अशी (होणारी)बायकोही आहे.पण ती एक पात्र आहे.लग्न होणारच आहे तर पळून का जायचे म्हणते!मग एकटेच पळुन जावे लागेल असे वाटतेय.पण तरी एक अडचण आहेच.. आठवडाभर ती भेटली नाही तर कसे होईल अशी भीती वाटतेय.पण मला माहित आहे,एकदा मी निघालो की कही असे होणार नाही.पण सध्या मनात आहेच की ते!आता काय करायचं?

बरं! माझी टेन्शनं तुम्ही का म्हणुन घेतात... मला आता लिहायचा कंटाळा आलाय! तेव्हा भेटू पुन्हा.. तोपर्यंत... हरी हरी!

Wednesday, October 18, 2006

Sweet Romance


गाण्यांच्या बद्दल लिहायचं म्हटलं की शब्द आपसूकच मदतीला धावून येतात.पण ज्यात शब्दच नाहीत अश्या एखाद्या Instrumental Piece बद्दल काय लिहावे हेच सुचत नाही.आपल्या भारतात मुळातच संगित म्हटले की चित्रपटसंगित नजरेसमोर येतं.जर भारतिय शास्त्रिय संगिताबद्दल अगदीच अंधार असेल तर वाद्यसंगित कुठून माहीत होणार!काही वर्षांपूर्वी अगदीच नादावलेल्या वयात एकदा दुकानात असाच TP करत असतांना त्या वयाला भुलावणाऱ्या नावाची एक cassette दिसली. Sweet Romance! कव्हरवरच्या सुंदर प्रकाशचित्रानेही मन मोहून घेतलं!cassette उचलून पाहिली तर त्यातल्या sweet romance या एका गाण्याने एक आठवण जागवली.शेखर सुमनच्या Movers & Shakers या कार्यक्रमात पं.शिवकुमार शर्मा यांच्या मुलाची म्हणजेच राहुल शर्माची मुलाखत घेतली होती.कार्यक्रम संपताना त्याने ह्याच गाण्य्यातला(?) छोटासा भाग संतूरवर वाजवून दाखवला होता.अगदी captivating वाटला होता मला तर! लगेच cassette घेतली.अश्या खरेदीची गंमत अशी की मला लगेच ती ऐकायची असते. कपडे खरेदी असेल तर घरी जाताच ते वापरायचे असतात.कधी कधी तर मी दुकानातूनच असे कपडे,चपला तश्याच घालून निघतो.त्यावेळी माझ्याकडे एक डबडा टेप होता.पण त्यावरही काम भागत असे.टेपवर Reverse / Forward काम करत नसेच.दुसऱ्या ्बाजूच्या असलेले sweet romance ऐकण्यासाठी पूर्ण cassette हाताने forward करावी लागली.बी साईडला प्रथम येते ते 'मेला'! टिपिकल गावच्या जत्रेवरून कम्पोज़ केलेलं हे गाणं अगदीच ताल धरायला लावतं.मात्र मला नंतर काही कामामुळे थोडा वेळ बाहेर जावं लागलं.संध्याकाळी परत येताच पहिलं काम पुन्हा कॅसेट ऐकणं.धुळ्यासारख्या ठिकाणची हिवळ्यातली सरती संध्याकाळ!खूपच गारवा हवेत होता.मी दूध गरम करून त्यात मस्तपैकी नेसकॅफ़े टाकून पुन्हा टेप लावून बसलो.अश्या वेळी अगदी मंद प्रकाशात संगित ऐकायला मला जाम आवडतं.पुढचं कम्पोज़िशन होतं Remembering Her!याची सुरवात होते अतिशय विरही स्वराने.उगाच कुणाची तरी आठवण आल्यासारखं मलाही वाटू लागलं.आवाज जरा मोठा करून मी बाहेरच्या ओट्यावर येऊन बसलो.आजूबाजूला अगदीच शांतता होती.थंडीमुळे कुणी बाहेरही पडत नसतं.अश्या वातावरणात संतूरचे सूर अधिक आत घुसत गेले.एका आर्त नोटवर ते कम्पोज़िशन संपले.दोन ट्रॅकमधली रिकामी जागा खूप लांबली असल्यासारखी वाटू लागली.आणि अचानक त्याच संतूरचे अतिव आनंदी स्वर कानावर पडले.संध्याकाळच्या वेळी आपल्या प्रिय माणसाची वाट पहात बसावं.माहीत असावं की ते माणुस येणार नाही.आणि अचानकच त्याचं येणं व्हावं.तीच भावना होते Sweet Romance हा ट्रॅक ऐकतांना.remembering her सारख्या उदास ट्रॅकनंतर आल्याने sweet romance अधिकच प्रभावी होते.संतूरचे स्वर खरं तर मला खूपच आवडतात.त्यात का कुणास ठावूक एक खूप मोकळेपणा वाटतो.सनई एका अर्थाने दुःखाचे प्रतिकात्मक स्वर घेऊन येते.त्याच्या अगदी उलट म्हणजे उत्कट आनंदाचे स्वर असणारे संतूर!(अर्थातच या माझ्या स्वतःच्या समजुति आहेत.)हा आनंद संयत असा नसतो तर अगदी नाचायला लावणारा आनंद!हिरव्यागार टेकडीवरच्या चढ-उतारांवरून पळापळ करत दमून जावे यातही एक आनंद असतो.अगदी तसेच वाटतात मला sweet romance चे स्वर! खरं तर हे नीट व्यक्तही करता येत नाही आणि शब्द नसल्याने त्याबद्दल लिहिताही येत नाही. पण खूप काही सांगावसं वाटतं.पण नाविलाज को क्या विलाज! तुम्ही ते ऐका स्वतःच!अल्ल्ड वयात तिच्या जवळपास असण्यानेही हुरळून जावे,तिच्या ओझरत्या नेत्रकटाक्षानेही हवेत उडायला लागावे,ती लाजली तर जीवच द्यावासा वाटावे,अचानक पाऊस यावा,तिने भिजत असता तिला आपल्या छत्रीत घ्यावे,तिचा ओझरता स्पर्श व्हावा,मग आपण उगाच तिच्या हाताला स्पर्श करावा,तिने लाजून चूर व्हावे आणि मग सारे जगच पावसात विरघळून गेल्यासारखे आपण दोघेच उरावे.. असाच हा पहिल्या प्रेमाचा स्पर्श.. A Sweet Romance!

Saturday, August 5, 2006

आये तुम याद मुझे...

काल किशोर कुमारचा जन्मदिवस होता.भारतिय हृदयाचा एक कोपरा कायम व्यापणाऱ्या काही निवडक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किशोर कुमार!'किशोर' इतकंच त्याला म्हणता येतं.उगीच कोणत्याही प्रकारचे आदरार्थी विशेषणं त्याला लावायची गरज नाही इतका किशोर आपला वाटतो.विविध दूरचित्रवाणि वाहिन्यांनी काल विविध कार्यक्रम सादर केलेच पण केक कापून जणू किशोर आजही आपल्यातच आहे असा उत्सव साजरा केला.आणि ते काही खोटंही नाही.आयुष्याच्या कोणत्याही वळणावर किशोरचं एखादं गीत आपली साथ करतच असतं.मग प्रसंग आनंदाचा असो,दुःखाचा असो किंवा कोणत्याही भावनेने अलिप्त असा असो.. किशोरचं गीत आठवतंच आपल्याला!पण आज मला आठवतंय त्याचंच एक गीत,'मिली' चित्रपटात अमिताभसाठी गायलेलं.. आये तुम याद मुझे.......

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन

काल सारखं हेच गीत का ओठी येत होतं कळेना.. अगदी जड आणि दर्दभऱ्या आवाजात किशोर गातो.. अमिताभ येरझऱ्या घालत गात असतांना दिसतो पडद्यावर.

जिसपल नैनों मे सपना तेरा आये
उसपल मौसम पर मेहन्दी रच जाये
और तू बन जाये जैसे दुल्हन

कवी योगेश यांची एक सुंदर कविता,साधी पण आशयगर्भ शब्दरचना आणि सचिनदेव बर्मन यांचे संगित; या सगळ्यांवर कळस म्हणजे किशोरचा आवाज़!

जब मै रातों मे तारे गिनता हूं
और तेरे कदमों की आहट सुनता हूं
लगे मुझे हर तारा ,तेरा दर्पण

सुरवातिला गोड आणि रोमॅन्टीक गाणीच किशोरच्या वाट्याला आली होति.पण पुढे जेव्हा अशी दर्दभरी गाणी त्याला मिळाली तेव्हा किशोर काय चीज़ आहे हे जगाला कळून चुकले.असंच एक 'मंज़िले अपनी जगह' किंवा 'मेरा जीवन कोरा कागज़' कायम गुणगुणायला लावणारं!

हरपल मन मेरा मुझसे कहता है
जिसकी धुन मे तू खोया रहता है
भर दे फूलोंसे उसका दामन

या गाण्यातल्या प्रत्येक कडव्याची सुरवात काहिश्या निराशेने होते.आणि मग तिसरी ओळ येते तेव्हा एका स्वप्नजगतात नेणारा आशावाद प्रतित होतो.'जब मै रातों मे..' म्हणतांनाचा किशोरचा आवाज आणि शेवटी 'लगे मुझे हर तारा,तेरा दर्पण' म्हणतांना प्रत्येक भावना जगणारा किशोरचा आवाज, जादूई आहे हेच पुन्हा प्रतित होते.गायनातले कोणत्याही प्रकारचे formal शिक्षण न घेतलेला किशोर हे जे करतो त्याला दैवी देणगीच म्हणावे लागेल.किशोरच्या आवाजातली जादू अनुभवायची असेल तर याराना चित्रपटातली दोन गाणी आवर्जून ऐकावीत.खरं तर दोन्ही गाणी पडद्यावर साकारली आहेत पुन्हा अमिताभनेच!पहिलं गीत आहे अतिशय हळूवार प्रेमगीत..."छूकर मेरे मनको"... यातला 'छूकर' कितीतरी हळूवारपणे स्पर्शून जातो.आणि हे गाणं संपत नाही तोच दुसरं गाणं सुरू होतं ते म्हणजे 'सारा ज़माना'! दोन्ही गाण्यांतला ज़मीन आसमानाचा फ़रक किशोरच्या आवाजातून किती अधोरेखित होतो!वाटतं,हळूवारपणे स्पर्शून जाणारा हाच का तो किशोर जो अगदी टपोरी ढंगात 'सारा ज़माना' म्हणतोय!

किशोरचा स्पर्श झालेली कितीतरी गाणी नुसति ऐकत रहावसं वाटतं.सहज आठवायचं म्हटलं तरी कितीतरी गाणी मनातून सरळ ओठांवर येतात.जादूच म्हणावी लागेल ही किशोरची!आज किशोर नसला तरी तितक्याच उत्साहात त्याचा जन्मदिन साजरा होतोय.पुढेही होतच राहील.पण त्याची आठवण देणारं हेच गीत पुन्हा त्याच्यासाठीच अर्पण...

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन!

Wednesday, June 21, 2006

मनी मायबोलि (माझी मातृभाषा)

(गायत्रिचा ब्लॉग वाचतांना लक्ष्यात आलं की ही बया विविध बोलिंत लिहित सुटलिय.तिने माझ्या मातृभाषेत लिहायच्या आधीच मी लिहिणं अगदी गरजेचं आहे :) )

आपला राज्याना उत्तरेकडना जिल्हा म्हन्जे धुये,नन्दुरबार,जयगांव आनि नाशिकना उत्तर भाग याले 'खान्देश' म्हन्तस.गंज (खूप) वरीस तठे (तिथे)मुसलमानी राजे लोकेस्नं राज्य व्हतं त्यानालागे (त्यामुळे) 'खान देस' असं नाव पडनं.आते या भागमा बोलतंस ती बोली म्हन्जे 'अहिराणी' खरं तं 'ऐरानी' बोली!
तिच मनी (माझी) मातृभाषा. माय बोलस ती 'मायबोली'! आमनि माय आन बाप येरायेर (एकमेकांशी)ऐरानीमाच बोलतंस आनि भांडतसबी!
मना (माझ्या) मायआजीले ते (तर) ऐरानी सोडता दुसरी भाषा येये न्हई. कानले ऐकाले गोड वाटस (वाटते) ऐरानी.खान्देस म्हन्जे त्याले गुजरात,मध्ये परदेस जोगे (जवळ)शे (आहे)!त्यानलागे ऐरानीमा मारवाडी,गुजराती आनि हिन्दीना बराच शब्दे येल शेतस.्वाक्यरचाना हिन्दिसारखी र्हास!कोन म्हनस जुना जमानामां ह्या भागवर 'अहिर' राजानं राज्य होतं.. त्यानालागे ह्या भासाले (भाषेला) 'अहिराणी' नाव पडनं.कोन म्हनस,'ह्या भागमां तव्हंय (तेव्हा) राह्येत त्या लोकेसले (लोकांना) 'अव्हेरी' (अव्हेरून) टाकेल व्हतं आन म्हनून त्यास्नी भाशा म्हन्जे 'अहिराणि' ! आते जे बी कारण व्हई ते व्हई.बठ्ठा लोके हाई भाषा बोलतंस हे नख्खी!गावम्हदार (गावांमध्ये) मराठी बोलनराले एक ते 'मास्तर' म्हनतंस न्हई ते 'दीडशहाना'!तुम्हले म्हाईतीच शे (आहे) बहिणबाई ह्या जयगांव जिल्हाना व्ह्यत्या.त्यास्न्या कविता ऐरानीम्हदारच शेतस! हा,यक शे,त्या भागमा ऐरानी जास्त मराठीसारखी र्हास.पन धुया भागमां बोलतंस ती पिव्वर ऐरानी!
आते (आता) मी ऐरानीम्हदार लिखानां संकल्प सोडेल शे,ते काय काय लिखसू याय (वेळ) जमीं तसा आन सुची तसं!

Monday, June 5, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदीयाळी...

रजनीगंधाने या खेळात Tag करायला एक महीना उलटून गेला आणि पुस्तकांच्याबद्दल लिहायचे सारखे राहून जातेय.असेच होते... एखाद्या गोष्टीबद्दल खूप काही बोलायसारखे असले की ऐनवेळि शब्दच अपुरे पडतात किंवा सुचतच नाहीत! अगदी सहजच आठवायची म्हतलिइ तरी कितीक पुस्तकं डोळ्यासमोर येऊन जातात.एकाबद्दल लिहायचं म्हटलं तर दुसरं नक्कीच रुसणार!काही पुस्तकं एखाद्या शिक्षकाप्रमाणे भेटली,खूप काही शिकवून-समजावून गेली.काही अगदी सवंगड्याप्रमणे गळ्यात हात टाकत आपली गंमत सांगत राहिली.काही वेड्यासारख्या कथा सांगता सांगता हसवून गेली तर काही करूण-काव्य सांगताना रडवून गेली!काहींनी युद्धाच्या कथा सांगतांना अंगातळं रक्त सळाळून गेलं तर कधी त्यातलीच करुणा वाचून मन हेलावून गेलं.प्रत्येकाची वेगळी शैली,प्रत्येकाची वेगळी कथा आणि वेगळी तऱ्हा!
म्हणूनच एकाबद्दल लिहितांना दुसऱ्याला राग येणार तर नाही ना अशी भीती वाटते.पण नाही येणार त्यांना राग तसा.. आणि आलाच तर आपल्याच माणसाच्या रागाचे काय ईतके? एक हाक मारली तर गाल फ़ुगवून जवळ येतील आणि पुन्हा तोच प्रेमसंवाद चालू होईल.. तर.......

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
मी एका वेळी दोन तरी पुस्तके वाचत असतो त्यामुळे...
माणूस आणि झाड ले. निळू दामले आणि अवघाची शेजार- राणी दुर्वे

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
इथे एकाबद्दलच लिहितो:माणूस आणि झाड:जेमतेम नव्वद पानांचं हे पुस्तक.. मुखपृष्टापासुन मनात ठसतं.आपण पुस्तकात काय वाचणार आहोत हे सांगणारं इतकं सुन्दर मुखपृष्ट मला तरी दुसरं आठवत नाहिये सध्या!लहानपणापासून आपण इतकी झाडं पाहतो की ्त्यांच्याविषयी वेगळा विचार कधी होतच नाही.आई,बाबा,भावंड यांच्याविषयी आपण जितके आश्वासक असतो तितकेच या झाडांबद्दलही! त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याविशयी गप्पा मारायच्या राहूनच जातात! निळू दामलेंनी या सृष्टीची आपल्याला असलेली ओळख अधिक दृढ करून दिलीय या पुस्तकाद्वारे!इतकी की आपल्या गप्पा अजून रंगतील आता झाडांसोबतच्या!कुठेही काही वैज्ञानिक सिद्धांत माडतोय असला अभिनिवेष नाही की कठीण शब्दांचा अडसर नाही.झाडांबरोबरच्या आपल्या नात्याप्रमाणेच अगदी साधी सरळ ओघवती भाषा!एकाका मित्राची ओळख करून दिल्याप्रमाणे एकेका भागाचं सुंदर वर्णन आणि अलगद त्याच्या अंतरंगात डोकावणे.. इतकी सुंदर त्यांची भाषाशैली आहे.मी वर्नन करन बसण्यात अर्थ नाही.झाडासारख्या मित्राची नवीन ओळख करून देनारं हे पुस्तक स्वतःच अनुभवायची चीज़ आहे!

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१)म्रुत्यंजय-अगदि कुमारवयात वाचलेले हे पुस्तक नंतर अनेकदा वाचले.प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या कारणांनी आवदत गेले.वृषालीची कर्णाशी पहिली भेट तर कायम लक्षात राहिल अशीच आहे.शेवटच्या प्रकरणात अश्रू आवरणं अवघडच आहे.

२)राजा शिवछत्रपती-शिवचरित्रात हरवून गेलेल्या माणसाने लिहिलेले हे चरित्र आपल्याला वेड न लावेल तरच नवल!सर्व इतिहास माहीत असूनही प्रत्येकदा आणि पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा आणि शिवरायांबद्दल आदर,भक्ती,प्रेम पुनःपुन्हा वाढवणारा हा इतिहास तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही 'करंटे' आहात! आई भवानीला साकडं घालणारं पहिलं प्रकरण अंगावर अक्षरशः काटे आणतं!

३)स्मृतिचित्रे- एकासाध्या सरळ गृहिणीने तिच्या साध्या सरळ भाषेत सांगितलेली स्वतःची कथा!कधी गंमतिने हसवून तर कधी मन हेलावणऱ्या प्रसंगानी डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही!जगणं किती सोपं करता येतं हे शिकायचं असेल तर वाचायलाच पाहिजे हे पुस्तक!

४)तळ्यांतल्या साऊल्या- मी पुस्तकांबद्द्ल लिहितोय आणि कवितांबद्दल एक शब्दही नाही,हे होणे नाही. पुरुषोत्तम पाटील या माणसाचे दोनच काव्यसंग्रह आतापर्यन्त प्रसिद्ध आहेत,त्यातला हा पहिला!अगदी साध्या शब्दांतल्या आणि लयीतल्या त्यांच्या कविता कितिही वेळा वाचल्या तरी मन भरत नाही!त्यांच्या कविता वाचल्यावर उमताणऱ्या प्रतिक्रिया केवळ अश्याच असतात..... 'अशक्य लिहितो हा माणुस','महान','काय पण शब्द वापरतो हा माणुस'...
'ओठांशी थेंबला चन्द्राचा उद्गार,हातघाई झाला मदालस वार' असले लिहिणारा हा माणूस तितका प्रसिद्ध नाही याचे मात्र वाईट वाटते.पुन्हा इतक्याच कवितांवर तहान भागत नाही हेही खरेच!

५)लंपन ची पुस्तके: प्रकाश नारायण संत... चारच पुस्तकं लिहून मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण करणारा लेखक! लंपनचा खट्याळपणा,त्याला होणारे निरनिराळे भास,त्याचं भावविश्व.. सगळं वाचून आपल्याही घश्यात काहीतरिच होऊ लागतं,हेच या लेखनाचं यश.यातली 'शारदा संगित' ही कथा तर वेड लावते मला!तुम्हीही वाचून वेडे व्हाच!

कितिक पुस्तकं समोर उभी राहून 'माझ्याविषयी लिही ना रे!' म्हणुन मागे लागली आहेत.पुलंचा सगळाच 'गोतावळा' आवडतो.वपुंची 'महोत्सव,तू भ्रमत आहासी वाया,ही वाट एकटीची,अशी अनेक पुस्तकं आहेत.अजूनही उल्लेखनिय म्हणजे प्रतिभा रानडे यांचं 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'!विविध विषयांवर एका विदुषीशी मारलेल्या गप्पा किती काय देऊन जातात.

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१)समिधा-साधना आमटे
२)गोईण-राणी बंग
३)शाळा-मिलिंद बोकील
४)समग्र मीना प्रभू
५)संभाजी-विश्वास पाटील

५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
पूर्वी लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत राणी दुर्वे यांचं एक सदर येत असे,'शेजार' म्हणून!त्यातिल लेखांचं संकलन असलेलं पुस्तक म्हणजेच 'अवघाची शेजार'! कोनत्याही पानापासून कसेही वाचत रहावे आणि नवल करावे या विविध शेजारांचे आणि ते अनुभवणाऱ्या राणी दुर्वे यांचे! माणसांची आवड,नवनव्या अनुभवांची आवड,ट्रेकींगची आवड,कवितांची आवड या समान धाग्यांमुळे त्यांनी लिहिलेलं मनात अलगद उतरतं!शेजार इतका मर्यादित canvas घेऊन किती सूदर चित्र रेखाटावं!एकेक शेजार म्हनजे एकेक समृद्ध अनुभव आहे यातला! मग ती ग्लोरीया असो की बिळातले शास्त्रिबुवा,गचागच भरलेला लेडिज डाब्यातला अडाणी बायकांचा शेजार असो की अजून कुणाचा.. असा रंगतो हा शेजार की बस्स!त्यांचं लेखन मला शांता शेळके,अरुणा ढेरे यांच्या घराण्यातलं वाटतं... जीवनावर भरभरून प्रेम करणारं आणि तितक्याच त्रयस्थपणे त्याकडे पाहणारं!
गंमत अशी की खूप जणांना या पुस्तकाविष्यी माहीत नाही असं दिसलं.पण आता माहीत झालं आहेच तर एकदा डोकावून पहा या 'शेजारात' आणि त्यातलेच होऊन जा!

Thursday, June 1, 2006

हमे तुमसे प्यार कितना…


वसंताच्या आगमनाबरोबर कोवळी लुसलुशीत पानं दिसू लागतात,सृष्टीचं रुपडंच बदलून जातं. अश्याच वसंतातल्या एका सकाळी तीच पालवी थोड्या वेगळ्याच रुपात येते.कोवळी प्रेमभावना कुठून,कशी आणि अगदी नकळत मनात उमलत जाते.असं कसं हे प्रेम,नीट उमजतही नाही आणि सुटतही नाही.व्यक्त करावं म्हंटलं तर तेही नाहीच! तिच्याशिवाय काहीच दिसत नाही पण तिच्यापर्यंत पोचवताही येत नाही.कधी उन्हाचा कहर तर कधी जीवाची घालमेल करणारा उकाडा! असाच उन्हाळा येतो.असाच जीव बेचैन होत राहतो.आणि अचानकच आकाश भरून जातं,्निळशार आकाश अगदी काळंकुट्ट होऊन जातं.मग तर बेचैनी विचारूच नका! काय कारावं हेही सुचत नाही. मग गडगडाट होऊन सगळं आभाळ वाहून जातं.प्रेम मोजता येत नाहीच.पण किती प्रेम आहे तिच्यावर हे कस्ं सांगणार?आणि मग मनातलं मळभ असंच दूर होतं.... प्रेम का अस्ं मोजता येतं?मग? नाही माहीत प्रिये,किती प्रेम आहे माझं,पण एक मात्र खरंय.. तुझ्याशिवाय जगणं नाहीच असू शकत.

हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


गहिऱ्या बासरीच्या स्वरांनन्तर ऐकू येतो किशोरचा जादूई स्वर!अगदी मुलायम आवाजात किशोर गायला लागतो आणि एका बेचैन आणि कोवळ्या प्रेमाची कथा उमलू लागते.किती खरंय नाही.. प्रेमाला कोणतं परिमाण लावणार?ते का असं मोजता येतं?ते असंच असतं.. अचानक कोसळणाऱ्या पावसासारखं! तेच सांगू जाणे.. तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे प्रिये!

कुणी असतिल असे जे प्रेमात वर्षानुवर्ष झुरत आहेत,प्रियेची वाट पहात असतिल! पण माझ्याने हे कसं बरं सहन व्हावं.

सुना गम जुदाई का उठाते है लोग
जाने ज़िन्दगी कैसे बिताते है लोग
दिन भी यहाँ तो लगे बरस के समान


सारं आयुष्य विरहात काढणारे कुणी और असतिल.. मला तर एकेक दिवस वर्षांपेक्षाही मोठा वाटतो.
प्रेमविव्हल प्रियकारचं हृदयच किशोरने आपल्या समोर उघडून दाखवलंय!
य कडव्याच्या आधी येणारं संगीत तर काय वर्णावं! वायोलिनचा आर्त स्वर,गिटारीचा हृदयाचे तार अन तार हलवणारा स्वर आणि तबल्यावर निघणारे दोलायमान मनाचे तरंग.. पुढच्या शब्दांची जादू आधीच घेऊन येतात.
प्रेमात मी किती वाट पाहू शकेन हे माहीत नाही मला ,पण एक मात्र निश्चित आहे

हमे इंतज़ार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


ही तर झाली प्रियकराची स्थिति! पण तिचं काय? तिला या प्रेमाचा थांगपत्ता आहे की नाही?
काहिही काय? असं कसं होईल...
आर्त प्रेमाची ही हाक तिला ऐकू न यायला तिचं हृदय दगडाचच हवं.मग? काय आहे तिच्या मनात?

तिचंही उत्तर आहेच की! तिचही प्रेम आहेच की.. आपले महाशय प्रेमात आज पागल झाले आहेत.. पण तिच्या मनात हा प्रेमभाव कधीच जागृत झालाय.. महाशयांना काही कळायच्या आधीच...

मै तो सदासे तुम्हरी दिवानी,
भूल गये सैंया प्रीत पुरानी,
कदर न जानी कदर न जानी


परविन सुलताना! नावंच पुरेसं आहे. एका तरल आवाजाचं मुर्तिमंत प्रतिक! त्या गातात तो मुखडा तोच आहे(गीत वेगळंच असलं तरी),पण त्यातला अंदाज़ काय वर्णावा! यातल्या ‚प्यार’ या शब्दावर जी काय करामत केलीय त्यांनी.. अहाहा! आणि ॑मगर जी नही सकते’ मधल्या ‚॑बिना’ वर तर काय कलाकुसर केलिय! त्यांनी उलगडुन दाखवलंय प्रेयसीचं मन!
मै तो सदासे तुम्हरी दिवानी...
तुला कधीच नाही कारे कळलं?तूच बहुदा विसरुन गेला आहेस ही जन्मांतरीची प्रीत. माझ्या प्रेमाची तुला कधी किंमतच नव्हती जणू!
अहाहा! इकडे तो झुरतोय प्रेमात,कळत नाहिये कसं व्यक्त करावं हे प्रेम आणि ती तर जन्मांतरीच्या प्रेमाची साद घालते आहे. काय म्हणावं अश्या मधुर प्रेमाला? अस्ं वाटत्ं की आपणच जाऊन सांगावं की बाबांनो,का झुरताय असे विरहात? दोघेही तितकेच तर व्याकूळ आहात एकमेकांसाठी! पण ते सोडून देऊयात या गाण्यावरच...

पुन्हा एकदा किशोरच्या गाण्याकडे आपोआपच माझं मन वळतं.अगदीच कोमल प्रेम ,तितकंच हळवं! मग त्यात possessiveness असणारच! त्यात गैर असं काहीच नाही.पण महाशयां्नी अगदीच सीमा गाठली आहे म्हणावं लागेल...

तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल
बडी मुश्किलों से फ़िर संभलता है दिल


प्रेमात वाटेकरी नको हे ठिकच! पण तुला दुसऱ्या कुणी बघणंही मला जाळत जातं.काय करू मी?मनाला आवर घालूनही सावरायला वेळच लागतो.तुझ्या आठवणीतही मला वाटेकरी नकोय. तुझ्या काय काय गोष्टी लक्षात आहे म्हणून सांगू?तुझं हसणं,बोलणं,बोलतांना मध्येच तिरकी मान करून बघत राहणं आणि काय काय! वेडाच झालोय म्हण ना मी तुझ्या प्रेमात!ही बेचैनी नाही मला सांगता येणार....

क्या क्या जतन करते है तुम्हे क्या पता
ये दिल बेकरार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना


पण तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच अशक्य आहे! तिचा आवाज ऐकाव तर केवळ मीच,तिला पहावं तर फ़क्त मीच,ती फ़क्त माझीच असावी! अगदी विचारातही तिच्या प्रेमात मला वाटेकरी नकोय!
हेही प्रेमाचं एक रुप!
आता आपल्याला कळलंच आहे की तीही तितकीच प्रेमात आहे तर तिचीही मनःस्थिति पाहूयात की जरा...

कोई जो डारे तुमपे नयनवाँ
देखा न जाये मोसे सजनवाँ
जले मोरा मनवा जले मोरा मनवा


त्याच्या प्रेमात passion आहे तर ती थोडी अधिक मनाच्या पातळीवर दिसतेय.पण तिलाही कुठे सहन होतय त्याला कुणी पाहणं?कुणी त्याच्याशी हसून बोलत असली तरी हिचा जीव खालीवर होतो.
परविन सुलताना! मी खरं तर त्यांचं version ऐकून काही वर्षं लोटली आहेत.तसं ते मी ऐकलही खूप उशीराच.आणि आश्चर्य वाटत राहिलं,अरे हे इतकं सुंदर गीत आपण पूर्वी कसं बरं नव्हतं ऐकलं?पण बरंच झालं म्हणायचं. वयाच्या टप्प्यावर थोडि ऊशीराच भेटलेली गाणी असोत की माणसं... खूपच लक्षात राहतात... आणि आवडून गेली तर विचारूच नका! त्यामुळेच आज काही वर्षांनंतरही मला त्या गाण्यातले त्यांचे शब्दनशब्द,सूर अन सूर कानात घुमाताहेत! ’जले मोरा मनवा’ यात दोनदा येतं.पहिला वरचा सूर आणि नंतरचा खाली अलगद येणारा स्वर... अहाहा! टीपेला पोचलेला झोका तितक्याच नैसर्गिकतेने,सहजतेने खाली यावा तसा भास होतो हे ऐकतांना!
खरं तर ही दोन्ही व्हर्जन्स चित्रपटात वेगवेगळ्या वेळेला येतात.पण केवळ गीत म्हणून ऐकतांना मला त्यांचा परस्परांतला संबंध नेहेमीच जाणवतो.
भारतिय अभिजात संगिताशी सलगी साधणारं परविन सुल्ताना यांचं व्हर्जन असो की हृदयाला भिडणारं किशोरचं व्हर्जन,त्यामागे जादुगारी एकाच माणसाची.. RD! वेडं करतो खरं तर हा माणूस.. आपण किती वेळा त्याला दाद देणार? बस्स! त्याने संगितातून घोळवून काढलेली गाणी ऐकत रहावं आणि म्हणत रहावं ’सलाम RD!’

मजरूह सुलतानपुरींनी दोन्ही गीतं शब्दबद्ध केलीय.अगदी साध्या सोप्या शब्दांत खूप काही मांडून जाणं हाच मजरूह यांच्या गीतांतला स्थायीभाव!म्हणूनच तर नूतनसाठी
’चाँद फ़िर निकला मगर तुम ना आये
जला फ़िर मेरा दिल,करू क्या मै हाये’
लिहिणारे मजरूह आमिर खानसाठी ’्पापा कहते है’ लिहू शकतात आणि ट्विंकल- सलमानसाठी
’बाहों के दरमियाँ’ लिहू शकतात!
प्रियकराची अगतिकता आणि प्रेयसीचा अनुराग,दोन्ही एकाच मुखड्याच्या गीतांत उतरवतांना किती वेगवेगळे भाव ओतले आहेत!
किशोरबद्दल तर बोलावं तितक्ं थोडंच आहे! त्याच्या मर्यादांवर बोट ठेवणारेही त्याच्या तितक्याच प्रेमात असतात जितके की त्याचे die hard Fans!

प्रेमाचा अनुभव घेतल्याशिवाय नाहीच लिहू शकत हे गीत,नाहीच येऊ शकत याचे स्वर तितके मनातून! आणि अशीच वेळ असेल तीही... भुरभूर पावसाची.. तिच्या प्रेमात झुरण्याची... तिने आतून ’ओ’ देण्याची आणि हुरहुर लावणाऱ्या तिच्या उत्तराची!

उगाच हे गीत ऐकून मन हळवं होतं... उगाच कुणासाठी तरी झुरावसं वाटू लागतं... आणि झिरमिर पावसाच्या साथीनं म्हणावसं वाटतं...

... मगर जी नही सकते तुम्हारे बिना!

(मी स्वतःला संगितातला जाणकार समजत नाही.त्यामुळे ही काही गीताची समीक्षा नाही.एका दाद द्याव्याश्या वाटणाऱ्या ,आतून आनंद देणाऱ्या गाण्यातला आनंद सगळ्यांबरोबर वाटून घ्यावासा वाटला म्हणुन हा प्रपंच!)

गिरीराज

Saturday, May 27, 2006

संदीपच्या चाहत्यांसाठी :
संदीपची एक छान मुलाखत मायबोलिवर प्रसिद्ध झालि आहे. एका अर्थाने इतका प्रसिद्ध कवी मुलाखत देतांना किती सुंदर बोलतो ,कोणताही अहंभाव न ठेवता, वाचाच तुम्ही!
अगदी समोर बसून आपल्यशी बोलतोय असी ही मुलाखत झालिय!

मुलाखत खालिल दुव्यावर वाचू शकाल…

http://www.maayboli.com/hitguj/messages/34/109243.html?1148715328

(Devanaagari Font: gargi or Arial Unicode MS)

Sunday, April 30, 2006

घाटाचे आश्रमातून दिसणारे दृश्य!
गगनगिरी आश्रम!
घाटातले एक वळण!
तळ्याकाठची संध्याकाळ- सावंतवाडी!



नापण्याचा धबधबा!

Saturday, April 29, 2006

घाट आणि गगनगिरी!

भर दुपारच्या उन्हात गगनबावड्याचा घाट चढायचा होता आणि त्याआधी बराच पल्ला गाठायचा होता.त्यातच माझं हेल्मेट अगदीच विचित्र होतं.काच वर जायची नाही आणि रहायचीही नाही.जर जोराजोरी करून वर केली तर वार्याने हेल्मेटच मागे सरकायचं.गोव्याच्या मानाने या भागात उष्णता जास्त होती.उन्हाचे चटकेही भाजून काढणारे होते.त्यातच मी टी शर्ट घातलेला असल्याने कोपरापासून पुढे चांगलेच चटके बसत होते.उष्ण हवेच्या झळा शरीरावरून जातांना वेगळाच अनुभव देत होत्या.हळून मन मागे गेलं ते पाच वर्षांपूर्वी अश्याच उन्हात दुचाकीवरून केलेल्या धुळे_सप्तशृंगी_ सापुतारा या प्रवासापर्यंत! ते तर भर मे महिन्यांतलं खांदेशातलं उन होतं आणि तापमान बेचाळीस पंचेचाळीस अंशांच्या दरम्यान! पुढचे चार महीने तरी आम्ही काळेकुट्ट दिसत होतो. तश्याच उन्हाच्या झळा आताही नाकातून फुफ्फुसापर्यंत जाणवत होत्या.पण फार जुनी ईच्छा पूर्ण होणार होती घाट पार करण्याची त्यामुळे त्यातही आनंदच वाटत होता.उन्हापासुन वाचण्यासाठी पुन्हापुन्हा पाणी,सरबते रिचवणं चालूच होतं.रणरणत्या उन्हाचं एक गोलाकार वळण आलं आणि घाटाला सुरवात झाली.बारा किमी चा हा घाट सध्या भरपूर रहदारीचा घाट आहे.सध्या गोव्याला जाणारी सर्वच वाहने फ़ोंडा मार्गे न जाता गागनबावडा घाटातूनच जातात.रात्रीच्या वेळी रस्ता अक्षरशः वाहत असतो.गोव्यातून पुण्याला येतांना आणि पुन्हा गोव्यात जातांना चार वर्षात अनेकदा या घाटाने गेलो होतो.वर चढतांना उंचच उंच वाटणारा डोंगर हळूहळू आपल्यपेक्षा बुटका होत जातांना पहायचा तर घाट उतरतांना हाच डोंगर उंच होतांना पहायचा. एक वाजेच्या सुमारास या घाटांत गाडी पोचते.रात्र चांदण्यांची असो की चंद्राची,घाटाचं सौंदर्य भुरळ पाडतंच! चंद्राच्या रात्री घाट उतरतांना सह्याद्रीच्या कड्याचे भयचकीत करणारे दर्शन होत राहते.दरी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही आणि वळणावळणाच्या रस्त्याची भीती वाटत राह्ते.मात्र चांदण्यांच्या रात्री घाटभर चांदण्या पसरलेल्या आहेत असे वाटत राहते.एखाद्या १८० अंशाच्या वळणावर तर गाडी चांदण्यांतच शिरते आहे असे वाटून जाते.पण हे सगळं रात्रिच्या प्रवासासाठीच आहे.आम्हाला मात्र टळटळीत दुपारचा घाट पार करायचा होता.घाट म्हटला की भरपूर वळणे आलीच.अश्याच रस्त्यावरून दुचाकी चालवण्याचा आनंद काही औरच असतो.या वळणदार रस्त्यावर 'वेडी वाकडी वळणे' असे लिहीलेली पाटी भरपूर ठिकाणि लावलेली आढळते. वळणे वळणदारच असतात.त्यातही वाकडि वळणे ही थोडी मोठी ईयत्ता! मात्र वेडी वाकडी वळणे म्हणजे हद्दच झाली,अगदी पदवीच! हा शब्द शोधून काढणारा महानच असला पाहीजे!या असल्या वेड्या वळणांवर 'वाहने सावकाशा चालवा' म्हणुन लिहिलेले असते मात्र मला अश्या ठिकाणी नेमकी जोरात चालवावीशी वाटतात!वळणं वेडी असतिल म्हणून काय झालं,मी त्यांच्यापेक्षा वेडा! अश्याच काही वळणांवर थांबून आम्ही कोकणचे सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेर्यात साठवून घेत होतो. १८० अंशांची काही वळणे तर इतकी अप्रतिम दृश्ये दाखवतात की बस्स!घाटातही इतर वाहनांशी पंगा घेण्याचा प्रकार चालूच होता.या घाटतून पूर्णवेळ गगनगिरी आश्रमाचे दर्शन होत राह्ते.रात्रिच्या प्रवासात तर गगनगिरीवरचे दिवे तार्यांशीच स्पर्धा करत असतात!असेच खेळत आणि निसर्गाच्या याही रुपाचा आस्वाद घेत आम्ही गगनबावडा गावात पोचलो तेव्हा एक वाजत आलेला.तसेच पुढे गगनगडावर पोचलो.एका डोंगरावर बांधलेला हा आश्रम म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल.तिथे जायला सध्या अर्धपक्का रस्ता आहे.पण पूर्वी तिथे पायवाटही नसावी.अश्या जागी हा आश्रम डोंगराशी सहजीवन साधत बांधून काढला आहे.आवश्याक इतकेच आधुनिक बांधकाम आणि बाकी दगडांचा नैसर्गिक आकार यांचा उत्तम वापर केलेला आहे.ते पाहून मला ग्रीसमधल्या पुरातन प्रार्थनास्थळांची आठवण झाली!(भले मी तिथे गेलेलो नाही तरीही!)सध्या महाराज इथे राहत नाहीत.पाण्यात उभे राहून तपश्चर्या केल्याने माश्यांनी त्यांचे तळवे आणि पाय खाऊन टाकले आहेत आणि त्यामुळेच त्यांना चालता येत नाही.तिथे गेल्यावर मामांचा पाय मुरगळला असल्याचे लक्षात आले.पण तरीही ते बर्याच पायर्या चढून आले.तिथे थोडा वेळ घलवून पुन्हा वर चढलो तर तिथे एक सभामंडप होता. त्यात दत्ताची आणि गगनगिरी महाराजांची मनुष्याकृति मूर्ती अगदी जिवंत वाटावी अशीच होति. क्षणभर दोन्ही मूर्त्या नसुन जिवंत माणसेच आहेत असा भास होत होता.हा भाग सर्वात उंच अस्ल्याने एका बाजूला गगनबावड्याचा घाट तर दुसर्या बाजूला भुईबावड्याचा घाट दिसत होते.असल्या डोंगरांमधून रस्ते शोधून काढणर्या माणसाचे नवल आहे.आज सर्वेक्षणाची आधुनिक साधने आहेत. पण देशावरून कोकणात उतरायला घाट फ़ार पूर्वीच बांधले गेले होते.असाच एक नाणेघाट आम्ही भर पावसार ट्रेक करून पार केला होता.हा सातवाहनकालिन घाट सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा आहे. धन्य धन्य!
आम्ही घाटांचं निरीक्षण करत असतांनाच पोरांचा एकच गलका ऐकू आला. तिकडे पाहिलं तर पाच सात वर्षांची चिमुरडी पोरं एका सरड्यापेक्षा मोठ्या प्राण्याच्या मागे धावाधाव करत होति.तिथे जाऊन पाहिलं तर घोरपडीचं एक पिलू चुकून या गडबडीत आलं होतं आणि वाट न सुचून इकडे तिकडे पळत होतं. मग त्याचे फ़ोटो काढण्याचा एक सोपस्कार पार पडला. जेवणाची वेळ झाल्याने पोटात कावळे ओरडू लागले होते आणि गावात जेवणाची अपेक्षत व्यवस्था होनार नाही म्हणुन आम्ही भुईबावड्याचा घाट उतरू पुन्हा कोकणात जावून जेवायचा बेत केला.दुसरं कारण म्हणजे गावात मिळणारं कोल्हापुरी झणझणैत जेवण आम्हा दोघांनाही त्रासदायक ठरलं असतं.पुन्हा पाऊण तास तरी भूक सहन करावीच लागणार होती.मग काय? निघालो!पुन्हा Vroooooooom!

Thursday, April 20, 2006

प्रसन्न सकाळ म्हण्जे काय तर आदल्या दिवसाचा सगळा शीण विसरायला लावणारी सकाळ!उठल्या उठल्या या प्रसन्नतेचा अनुभव घेतला.अहाहा!रात्री आजूबाजूचा परीसर दिसला नव्हता.आता मात्र एकेक नज़ारे पहायला मिळत होते.हॉटेलच्या मागच्याच भागात नदी वहात होती.मी टंगळमंगळ करेपर्यन्त दिनेश तिकडे फ़ेरफ़टका मारून आले होते.त्यांनी काही फ़ोटोही काढले होते.मग मी तयार होताच माझे एक फोटोसेशन झाले.:)सकाळी लवकरच निघायचे असल्याने न्याहरीची व्यवस्था हॉटेल करू शकले नाही पण चहा पिऊन आम्ही निघालो.तळेरे गाव येताच जरा पोटपूजा आटोपली.तिथे कोकम सरबत मागवले तर हे भल्या मोठ्या ग्लासात अगदी मधूर सरबत मिळाले.तृप्त होऊन निघालो.आता नापणे गाठयचे होते.नापण्याची ख्याति अशी की येथे एक धबधबा आहे की जो बारामहीने वाहतच असतो.कोकणाच्या आसपास असा प्रकार विरळाच म्हणावा लागेल.गोव्याचा दूधसागरही उन्हाळ्यात अगदीच कृश होतो.जसजसे पुढे जात होतो तसतसे जंगल थोडे विरळ होत चालले होते..मध्ये रस्त्यात विविध वाहनांशी रेसिंग चालूच होते.एका ट्रकवाला काही सईड देईना.बराच वेळ त्याच्या अगदी मागे मागे राहून ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला तर हा बाबा ऐनवेळेला गाडी उजव्या बाजूला घ्यायचा आणि आमचा प्रयत्न हाणून पाडायचा.पुढे येणार्या वळणार याला मागे टाकयचंच ठरवून आमच्या घोड्याला टाच मारली.वळणावर थोडी स्पेस मिळताच मी आमची दुचाकी दामटली आणि त्याला ओव्हरटेक करतांना चांगलाच दम भरला.तो काय हातवारे करतोय तिकडे ल़क्षही न देता.दुप्पट वेगाने गाडी दामटली.गगनबावड्याच्या दिशेने जातांना वैभववाडी लागले.तिथे नापण्याविषयी विचारले तर ते मागेच राहिले होते.पुन्हा मागे आलो तर पुन्हा रस्त्यात आमचा प्रिय ट्रकवाला समोरून येतांना दिसला.पुन्हा त्याच्या दिशेने बेफ़िकीरीने पहात आणि हॉर्न वाजवत मी सुसाट सुटलो.वैभववाडीच्या अलीकडे रेल्वे क्रॉसिंगच्या आधीच नापण्याला जाणारा फ़ाटा लागतो.तिकडे चौकशी करत करत नाप्ण्याच्या दिशेने निघालो.आता तर अजूनच वैराण दिसायला लागले.बारमाही धबधबा कुणाची तरी टवाळी असावी असं वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली.आणि अचानकच पुढ्यात काही मंडळी दिसू लागली.खालच्या दरीसारख्या भागातून पाण्याचा आवाज येत होता.त्यामुळे अगदी हायसं वाटलं.इथे झाडाच्या सावलीत मंडळी पत्त्यंचा डाव मांडून बसली होती.बरोबरीने 'आनंद'प्राशन चालू होते.मला असल्या लोकांची गंमत वाटते.या गोष्टी तर घरी बसूनही करता येतिल.मग उगाच मरमर करत एखाद्या निसर्गरम्य स्थळी येऊन पुन्हा तेच करत बसायचे.पुन्हा झाडा-पाना-फ़ुलांकडे वळूनही पहायचे नाही.जमल्यास 'झलक दिखलाजा' करत नाचायचे आणि तसेच कोरडेठाक राहून नाही नाही ती घाण तिथेच सोडून निघून जायचे.आम्ही आपला एक किंव करणारा कटाक्ष त्यांच्यावर टाकून धबधब्याकडे मोर्चा वळवला.पुढे जाऊन पहातो तर २५-३० फ़ूटांवरून पाणी उड्या घेत होते.जरा पुढे गेलं की पायथ्याशी उतरता येतं.तसंच खाली उतरलो.मी आपला लांबूनच निरीक्षण करत होतो.याआधी धबधब्यावरच्या दोन जीवघेणे प्रसंगांपासून मी पाण्यात उतरत नाही.आधीच पोहता येत नाही त्यात आगाऊपणा नको म्हणून मी काठाकाठानेच मजा घेत होतो.दिनेशना पाणी पाहिलं की उतरायचा मोह आवरत नाहीच.ते लगेच पाण्यात उतरले.मग मी पाण्याला वळसा घालून धबधब्याच्या अगदी खालीच पोचलो.तिथून वर चढून जायची तीव्र ईच्छा कशीबशी आवरली.तोपर्यन्त ऊन चंगलेच चटके देऊ लागले होते.पुढे निघायला हवे होते.गगनबावड्याचा गगनगिरी आश्रम आम्हाला खूणावत होता.तिथे जायला अर्धा पाऊण तास लागणार होता.ऊन मी म्हणत होते.आमचा घोडा पुन्हा भरधाव फ़ेकला.

Saturday, April 15, 2006

गोव्यातून बावड्याला जायचं म्हणजे सावंतवाडी-कणकवली-तळेरे असा मार्ग आहे.तळेरे पर्यंत हा मुंबई महामार्ग असल्याने खूप दिवसांपासून विसरून गेलेलं सुसाटणं मला आज अनुभवायचं होतं.हाताशी ऍव्हेंजर असल्याने बांदा येईपर्यंत अगदी सुसाट सुटलो.सावंतवाडीच्या अलीकडे इन्सुलीचा घाट लागतो.हा आमच्या प्रवासातला पहिला घाट! यातच गाडीची क्षमता कळून चुकली.मग काय ८०-९० चा वेग म्हणजे अगदी गल्लित असल्याप्रमाणे गाठला!हा घाट चढताच हवेत उष्मा जाणवू लागला.सावंतवाडीला पोचलो तोच गावात वळण्याच्या इराद्याने. पण मामांनी आठवण करून दिली की आता योगेश(माझा मित्र)ही तिथे रहात नाही.अगदी खट्टू होऊन मोतितलावाच्या काठाने चालू लागलो.सहा-साडेसहाची वेळ असल्याने वाडीकर फ़ेरफ़टक्याला निघालेले.तलावाला तसंच मागे सोडून जाववेना.मग काठाशी असणार्या पॉम्पस या रेस्टॉरंटमध्ये जरा कॉफ़िपान उरकण्यासाठी थांबलो.नजरेच्या एका टप्प्यात येणारा मोतितलाव पाहतांना कितितरी आठवणी जाग्या झाल्या.माझ्यासाठी सावंतवाडी म्हणजेच मोतितलाव,असा अर्थ आहे.तलावाभोवताली पसरलेला वाडीचा विस्तार,त्याला मर्यादित करणारे डोंगर,त्यातलाच एक नरेंद्र डोंगर,त्याच्या शिखरावर जातांना लागणारं अरण्य,शिखरावरून दिसणारं टुमदार सावंतवाडी आणि तलावाकाठी सूर्यास्ताच्या जोडीने केलेल्या गप्पा..... एवढं सगळं किती क्षणांत समोर यावं? मनाला मर्यादा नसतात हे मात्र खरं!परत यायला कधी जमेल माहीत नाही.अगदी निःशब्दतेने पुढचं मार्गक्रमण सुरू झालं.आपसूकच वेग कमी झाला.एव्हाना सूर्यास्त झाल्याने जड वाहानांनी रस्त्याचा ताबा घ्यायला सुरवात केली होती.त्यांचे हेडलाईट अगदी वैताग आणतात.त्यातच कोकणातले रस्ते अगदी वळणावळणांचे!आमचं पहिलं लक्ष्य होतं नापणे येथिल बारमाही धबधबा.त्यामुळे गगनबावड्याला सरळ न जाता रात्री कणकवलीतच मुक्काम ठोकायचं ठरलं.कण्कवलीच्या अलीकडेच एक चांगलसं हॉटेल पाहून तिथे उतरायचं ठरलं.जेऊन झाल्यावर एक फ़ेरफ़टका मारला.तिथेच एक शांत मंदीरात थोडा वेळ शांत बसलो.अविरत वाहणार्या रस्त्याकाठीही इतकी शांतता लाभू शकते.अंथरुणात पडताच झोप लागेल इतकं दमूनही झोप न लागणे याला काय म्हणावे?झोपेची आराधना करत असतांना केव्हातरी उशीरा झोप लागली.

Wednesday, April 12, 2006

गोव्याला जायचं काही निश्चित होत नव्हतं,पण जायचं मनात अगदी पक्कं होतं.मागच्या आठवड्यात दोन आणि या आठवड्यातल्या दोन मिळून चार दिवस सुट्टी मिळाली.माझ्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत मी जाणार की नाही हे मलाच माहीत नव्हतं.काही अडचण न येता मी उधळलो ते थेट गोव्यातच धडकलो.निघतांना गोव्यातल्या एप्रिलच्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल हे अगदी ठरवून गेलो.मनात कोणतेच plan न ठरवता तिथे गेल्याने इडूकल्या (चिमण्या इडल्या)हादडून सकाळी जो झोपलो तो अकरा वाजेलाच उठलो.अति झोपेने अंगात जडपणा येतो तसा आलेला.त्याची मजा लूटत गॆलरीत आलो तर अनपेक्षितपणे गार वारा सुटलेला.खरं तर या काळात सगळ्या कोकणपट्टिचं रुपांतर भट्टीत झालेलं असतं.इथे उकाडा असतो तर खान्देश-विदर्भात उष्णता असते.पण हवेचं हे सुखद रुप अजूनच सुखावून गेलं.सगळा जडपणा आपोआपच गळून गेला.वार्याबरोबर काजूच्या बहराचा गंध आणि जवळच असलेल्या कढीपत्त्यांच्या झुडूपांचा गंध एक वेगळीच रेसिपि तयार करत होता.आता वारा कसाही असला तरी पुढचे चार दिवस अगदी मजेत जाणार हे नीटच उमगलं.विचार होता की दिनेशमामांच्याकडची जमतिल तितकी पुस्तकं आणि सिनेमे खाऊन टाकायचे. सोबतिला त्यांनी बनविलेले अजब पण तितक्याच स्वादिष्ट चवीचे विविध पदार्थ असणार होते.उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणे यासारखा स्वर्ग नाही!आणि हवे ते लाड पुरवून घेणे यासारखे सुख नाही!दुपारी बरोब्बर १२.३० ला मामा आलेच आणि भरलेल्या भेंड्या,बटाट्याची भाजी,बिनतेलाचं लिम्बू-मिरची लोणचं,मिर्यांचं लोणचं अश्या अनोख्या पदार्थांवर भरपूर ताव मारला.आपण गगनबावड्याला जाऊत असं जेवतांनाच त्यांनी सांगितलं.मध्ये नापणे गावात बारमाही वाहणारा धबधबा बघयचा मग करूळ म्हणजेच गगनबावड्याच्या घाटातून वर जाऊन गगनगिरी महाराजांचा आश्रम पहावा असे ठरले.जमल्यास त्यांच्या मूळ गावी म्हणजेच राजापूरलाही जाऊन यायचे असा बेत ठरला. पण जायचं कसं हे काही ठरत नव्हतं.बसने जायचं तर त्यांच्या वेळा पाळायच्या,त्याप्रमणे झोपायचं आणि उठायचं आणि भटकायचं. हे काही माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं. दुसरा पर्याय दुचाकी भाड्याने घेऊन मनमुराद भटकणे,पण एकूण अंतर पाहता चांगली दुचाकी असेल तरच हा प्रयोग राबवायचा असे ठरले.पाच वाजता पणजी पोस्ट ऒफ़िसजवळ एकाशी घासाघीस करत दुचाकी भाड्याने घेतली.मला हवी तीच म्हणजे दूरच्या प्रवासात आरामदायक ठरेल अशी बजाज अव्हेंजर मिळाली,त्यामुळे माझ्या उधळण्याला मर्यादा पडणे शक्य नव्हते.आता थेट गगनबावडा गाठायच्या इराद्याने vrooom.. vroooooom... suuuuuuuuuuu...

Friday, March 31, 2006



आणि ही बहरलेली सावरी!



मी आणि माझ्या आवडीच्या तिन्ही गोष्टी: टेलिफोन एक्स्चेन्ज,टॊवर आणि सावरी!:)

Thursday, March 30, 2006

मन बावरी सावरी.

गोव्यातले एप्रिलमधले दिवस! भरपूर उन्हाळा, चिक्कार घाम,जीवाची घालमेल! असं सगळं वातावरण आणि मग एक सुट्टीचा दिवस! अहाहा! सुट्टीचा दिवस म्हटला की मला ्सकाळी लवकरच जाग यायची.सहालाच फटफटीत उजाडलेलं असायचं. मग मी सहज फेरफटका मारायला बाहेर पडायचो.सुटीच्या दिवशीच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमधल्या निर्मनुष्य रस्त्यांवरुन अगदी रमतगमत जातांना निरभ्र आकाशातल्या उंचावर उडणार्या पक्ष्यासारखं वाटायचं.जवळच असलेल्या आजोबा देवस्थानाच्या पायरीवर थोडावेळ बसायचं, मग अगदीच अलगद पुढे जात माझ्या घरामागच्या नदीच्या किनारी जायचं.तिथे नारळींची बरीच गर्दी आहे.त्याच्या अलिकडे बरीच मोकळी जागा आहे. त्यात मला आवडणारी दोन झाडं आहेत, पण एकमेकांपासून दुरावा राखूनच.दोघांचही वागणं सारखंच पण स्वभाव भिन्न! पहिला आहे चाफा आणि दुसरी सावरी किंवा काटेसावर.दोघही जेव्हा फुलून येतात तेव्हा सगळी पानं झाडून टाकतात.चाफा मी पूर्वीही पाहिला होता. पण गोव्याला आलो तेव्हा प्रथमच मी सावरी पाहिली.अश्याच एप्रिलमध्ये लालेलाल फुलून आलेली सावरी! चाफा कसा वेडावून टाकतो सुगंधाने.एकतरी फूल उचलावेसे वाटणारच.

नारळीच्या गर्दीमध्ये
उभा चाफा एक निष्पर्ण
मोही सुगंधाचा धनी
आणि संन्याशाचा थाट.

पण सावरीची गोष्टच न्यारी.तिच्या काहीश्या मोठ्या आकाराच्या लाल फुलांना सुगंध असा नसतोच.आकारही आकर्षक नाही.जमिनीवर पडली तर टप्प असा आवाज होतोच,इतकी वजनदार फुलं! बरं दिसायला झाड खूप आकर्षकही नाही,पंधरावीस फूटांपर्यंत वाढणार्या झाडाला बुंध्यापासूनच काटे असतात.तरीही मला सावरी खूपच आवडते.सावरीचं सौंदर्यच आगळं आहे.मार्चच्या आसपास फूलं फुलायला सुरवात होते आणि तोपर्यंत पानं झडून गेलेली असतात.एकूणच गोव्यात कितीतरी सावरीची झाडं आहेत.एकाच काळात सगळी बहरून येतात.हिरव्या पानांचा अभाव असल्याने लालसर गुलाबी रंगांनी सावरी उठून दिसते.लवकरच फळं धरायला लागतात. फूलं आणि नुकतीच उमललेली चैत्रपालवी ल्येवून सावरी काय दिसते म्हणून सांगू! स्वतःच पहायला हवा तो नज़ारा! नुकतिच वयात आलेली सावरी! सोसाट्याचा वारा आला की टपटप करुन फूलं गळू लागतात.मला आठवते ती सावरी चाफ्यापासून अंतर राखून उभी असलेली :

पाने गाळुन तशीच
दूर एकट सावरी
लालेलाल फुलू आली
आणि वाराही मोकाट.

चैत्रपालवी येऊ लागते आणि फूलं गळून हिरवी कोवळी फळं दिसू लागतात.हळूहळू फळं पिकून काळपट होतात. आणि मग उन्हाळ्याच्या भर मध्यावर तिचं मला वेडावुन टाकणारं रुप दिसु लागतं.
ही फळं म्हणजे शेंगाच असतात बोटभर लांबीच्या आणि दोन बोटभर जाडीच्या.पिकलेल्या शेंगामध्ये कापूस भरून असतो.आता सावरीला झुळूकही सहन होत नाही.तटतट करत शेंगा अलगद फुटतात आणि ्जुन्या आठवणींनी येणार्या अश्रूंसारखा कापूस बाहेर पडतो. सावरीचं हे रुप मला वाटत्ं एखाद्या विरहिणीसारखं! नदीच्या किनार्यावर एकटीच उभी असलेली सावरी जणु आपल्या दूरवर गेलेल्या प्रियकराची वाट पहात असते.अगदी वेड्यासारखी ही प्रतीक्षा! कुणाची पर्वा नसते पण लोकांचे वर्मी लागणारे बोल असतात. तश्याच मधूनमधून येणार्या उष्ण झुळकांनी सावरी दुखावली जाते.प्रियकारच्या एकेक आठवणि याव्यात तसे एकेक फळं उमलु लागतात आणि प्रत्येक आठवणिने व्याकूळ होत अश्रू यावेत तसा गोलाकार कापूस बाहेर येतो.आणि पुन्हा एकामागोमाग आठवणि येत रहाव्यात,एकीत दुसरीचं बीज असाव्ं तसंच प्रत्येक गोलाकार कापसांच्या बरोब्बर मधोमध काळपट बीज आहेच.पुन्हा एका नव्या सावरीला जन्म देण्यासाठी!
नदीकाठच्या सावरीला आणि चाफ्याला न्याहळत मी पुन्हा घरी परतायचो.तेव्हा अंगणातच असलेली सावरी वाट पहात असल्यासारखी वाटायची.ही सावरी माझ्या आवडत्या Tower ला अगदी लागूनच उभी आहे.अशी सावरी अंगचटीला येऊ देत नाही कारण तिचे काटे! पण tower वर चढून सावरीची फळं बोटाच्या हलक्याश्या स्पर्शानेही उमलून जाताना पहायची हा माझा तसाच निवांत उद्योग! कोंडून ठेवलेली गुरं दार उघडताच जशी भरभर बाहेर येतात तसाच सावरीचा कापूस बाहेर येतो. तरीही त्याचा आकार अगदी गोलगोलच राहतो. वार्याने उडालेला कापूस मागे धावत गोळा करायचा आणि त्याची उशी करण्याचा मनसुबा घोळवत रहायचे.मी तसा खूप कापूस गोळा करून ठेवला होता पण त्याची उशी काही तयार झाली नाही.ते घर सोडतांना तो कापूस तसाच सोडून आलो. आताही सावरी तशीच फुलून आली असणार. तिचा कापूस गोळा करण्यासाठी पुन्हा जाईन म्हणतो.मला माहीत आहे,ती अजूनही तशीच वाट पहात बसलेली असणार,

डोळे लागले सागरी
कधी येशील किनारी
वाट पाहुनी थकेना
मन बावरी सावरी.

Wednesday, February 15, 2006

आतल्यासहीत माणूस

दि.१३ फ़ेब्रु.ला संध्याकाळी ‘आतल्यासहीत माणूस’ या नीरजा पटवर्धन दिग्दर्शित कार्यक्रमाचा निमंत्रितांसाठी आणि पत्रकारांसाठी असलेला खास प्रयोग पाहिला.कार्यक्रमाला श्री.मोहन आगाशे यांची विशेष उपस्थिती होती.
मायबोलिकरांच्या (www.maayboli.com या वेबसाईटवर लिहिणार्यांच्या) समान धागा असलेल्या निवडक कविता सूत्रात गुंफ़ून त्यातिल आशय उलगडवून दाखवतांना दृक-श्राव्य माध्यमाचा उत्तम वापर असलेला हा प्रयोग आहे. कार्यक्रमाच्या माहितिपत्रिकेत नीरजा म्हणते की, “ स्वत:चा शोध हे सूत्र या सगळ्या कवितांच्या मूळाशी आहे.’माणुस असणं’ या कल्पनेचा हे कवी सतत शोध घेत असतात.या कवितांबद्दल ही गोष्ट मला सगळ्यांत अधिक भावली.म्हणुन या कविता नाट्यरुपाने रंगमंचावर आणायचा प्रयत्न केला आहे.”

या कविता नाट्यरुपाने प्रस्तुत करतांना कवितांच्या ओळी याच संवाद आहेत.कोणत्याही प्रकारचे निवेदन किंवा सुत्रसंचालन यात नाही.एकातून एक उलगडत जाणार्या कविता सादर करतांना अभिनय,संगित आणि प्रतिके यांचा उत्तम समतोल साधला आहे.यात अभिनय करणारे सर्व कलाकार नवखे आहेत.पण त्यामुळेच सादरीकरणातला जोश आणि प्रवाह सळाळता राहिला आहे.

आशयगर्भ असा हा प्रयोग दिसण्यातही तितकाच आकर्षक आहे.नीरजा म्हणते त्याप्रमाणे दृक भागामध्येही नाट्यात्मकतेची मोठी ताकद असते. मनातला गोंधळ,मनाचा आणि जीवनाचा बंदिस्तपणा दर्शवितांना दोर्यांचा वापर तसेच मुक्ततेला दृश्य रुप देण्यासाठी केलेला रंगीबेरंगी ओढण्या तसेच प्रकाशाचा वापर यातून ही नाट्यात्मकतेची ताकद जाणवत राहते. योग्य जागी संगिताचा वापर हा या प्रयोगाचा अजून एक plus point म्हणता येईल.संगित राहुल रानडे यांचे आहे.

या प्रयोगात सहभागी केलेल्या कवितांचे कवी आहेत; स्वाति केळकर ,दीपक जाधव, गिरीश सोनार,हेमांगी वाडेकर,पराग बुडुख,वैशाली सोनपत्की,पेशवा, क्षिप्रा आणि नीरजा पटवर्धन.निर्मिती,संहिता,वेषभूषा आणि दिग्दर्शन नीरजा पटवर्धन.

दि.१६ फ़ेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता पुण्यात सुदर्शन रंगमंच,शनिवार पेठ,पुणे येथे शुभारंभाचा प्रयोग आहे.

सकाळ मध्ये आलेली बातमी :
http://www.esakal.com/20060214/pune26.html

Friday, January 27, 2006

स्लॆमबुक

“चल उडजारे पंछी शहर के रास्ते
मेरी प्यारी सहेली को कहना नमस्ते”
किंवा
“ना सलाम याद रखना,ना पैगाम याद रखना,
बस इतनी आरज़ू है,मुझे याद रखना”

सहज जुन्या वस्तू बाहेर काढल्या होत्या.उगीच पडून असलेल्या बिनकामाच्या वस्तू टाकून जागा मोकळी करूयात म्हणून ठिय्या मांडून बसलो. जुने पेपर,मासिकं,कात्रणं,जुन्या वह्या असा सगळा खजिना बाहेर पडला. आवरणं बाजूलाच राहिलं आणि एकेक करून सगळयांवर नज़र फ़िरू लागली,मग हात फ़िरू लागला आणि मनावरची धूळ पुसली जाऊन मग मनही फ़िरू लागलं. मनाला अंतर,तारीख,दिवस असली बंधनं नसतातच! मग काय कुठून कुठे प्रवास चालू झाला. मग आईचं मागे राहून “आवर रे,आंघोळीला बस रे,पाणी गार होतंय!” वगैरेही ऐकू येणं बंद झालं.आई वैतागून आपल्या कामाला लागली. आता पाणी गार होतय ही काय धमकी झाली का? पण कोण सांगणार आईला? मी पुन्हा एकेक कात्रण,वह्या बघत बसलो.वडिलांनी २५ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या हिशेबाच्या वह्या तर अगदी मजेशीरच आहेत.मला घेतलेले शर्ट,त्यांच्या रंग आणि किंमतिसह नोंद करून ठेवले होते.तर कुठे शंभर रुपयांत घरच्या सगळ्या किराणामालाचा हिशेब आहे. अगदीच गंमतिशीर!

असंच चाळतांना बहीणीचं हस्ताक्षर दिसलं म्हणून पाहिलं तर तिची SlamBook! बारावी झाल्यावर तिच्या सगळ्या मैत्रिणींनी एकमेकीला ओल्या डोळ्यंानी स्लॆमबुक दिलेल्या लिहायला. त्यात काय लिहू म्हणून माझ्या मागे लागली तर मी त्यांची खिल्ली उडवायचो. या पोरी मात्र अगदी डोळे ओले करकरून त्यात उशीरापर्यंत लिहित बसायच्या. त्या वयानुसार त्यांच्या गोष्टी,गंमति आणि सिक्रेट्स त्यात लिहिलेली सापडू लागली.कुणी लिहिलं होतं,’Spread Sweet Smile’ तर कुणी लिहिलं,’Choose Chikana Chhokara’. हे आणि असले कितिक Short Forms ,मित्रांची सांकेतिक नावं ,उपदेशपर वाक्यं त्यात पेरेलेली दिसत होती.मैत्रिणीही दहा प्रकारच्या दहा!कोण लोढा तर कोण पटेल,कोण अरोरा तर कोणी पाटील! कुचेरीया, जैन, चव्हाण, भावसार, भट्ट, अग्रवाल, भोरसकर,व्यास,गिते आणि कोण कोण आडनावाच्या पोरींनी आम्हाला विसरू नको म्हणून आर्जवं केलेली. मला माहीत आहे बहीणीनेही असलीच काय काय भारूड-भरति तिला लिहायला आलेल्या बुकात लिहिली असणार. मी तेव्हा त्यांची ्खूप टर उडवायचो.पण एव्हढंच असतं का त्या स्लॆमबुकात? नाही! त्यांच्या आवडी निवडी,स्वभाव आणि जातिधर्मानुसार खाण्यापिण्याच्या सवयी यांचीही नोंद असते.नीट वाचतांना उलगडत जातात त्यांची स्वप्नं! जाणत्या-अजाणत्या वयातली स्वप्नं, शिक्षणाविषयीची स्वप्नं,करीअरविषयीची स्वप्नं, घराविषयीची स्वप्नं! त्यांच्या स्वपनातले राजकुमारही हळूच डोकावून जातात या स्लॆमबुकातून! बरं हे काही फ़क्त लिहूनच नाही काय ठेवलेलं! तर वेगवेगळ्या रंगांतून, designs मधून, stickers मधून सुंदर रीतिने सजवून ठेवलेलं हे सुंदर जग मला आज दूर कुठे नेत होतं.मनात विचार आला,कुठे असतिल या सगळ्या चिमण्या? कितीजणी आपल्या मैत्रिणिंची आठवण ठेवून असतिल?किति जणींचा आजही संपर्क होत असेल? त्यांनी पाहिलेली स्वप्नं कुठवर खरी झाली असतिल? आणि याच विचाराबरोबर अजून एक स्लॆमबुक आठवली.पण अगदी निकराने तिला मागे लोटून मी बहीणीच्या स्लॆमबुकमधलं पुढचं पान उलटलं. त्यातला संदेश होता…..
“समृद्धी प्रकृति और संस्कृतिसे आती है,संपत्तिसे नही!”
चमकून खालचं नाव पाहिलं तर तश्याच वळणदार आणि सुंदर झोकदार अक्षरात सही होती मेधा पाटकरांची! त्यावेळी नर्मदा बचावच्या आंदोलनानिमित्त्ताने त्यांना धुळ्याच्या जेलमध्ये ठेवलं होतं.त्यांचे समर्थक आणि आंदोलक जेलबाहेर त्यांना सोडावं म्हणून आंदोलन करत होते.ज्या दिवशी त्यांना सोडण्यात आलं त्याच दिवशी बहिणीने अगदी बहादुरीने त्या गर्दीत शिरून त्यांची स्वाक्षरी आणि संदेश मिळवले होते.त्यांच्या विषयी चांगलं बोलणारे ,वाईट बोलणारे यांची मोठीच संख्या आहे.मला किंवा बहिणीलाही त्याच्याशी कर्तव्य नाही.एका प्रसिद्ध व्यक्तिची स्वाक्षरी मिळावल्याचं समाधान तिच्या चेहर्यावर त्या दिवशी दिसत होतं.आणि आज तो संदेश वाचतांना त्यातला गहन अर्थ मला खूपच आवडून गेला.
पुढचं पान उलटलं तर कोण्या एका मुलीने लिहिलेलं तिचं डॊक्टर व्हायचं स्वप्नं समोर आलं.पुन्हा मनात आलं,खरंच झाली असेल का ही डॊक्टर?की चारचौघींसारखीच संसार एके संसार करत असेल? आणि पुन्हा एकदा मन भूतकाळात गेलं,अश्याच एका स्लॆमबुकमध्ये!

तिनेक वर्षांपूर्वी मामाच्या घरी गेलो होतो तेव्हा मामेबहीण नुकतिच दुसर्या वर्षाची परीक्षा देऊन सुट्टित घरी आली होती.परीक्षेच्या निकालापेक्षा तिला जास्त सतावत होति तिच्या मित्रमैत्रिणींची आठवण! आणि त्यातूनच ती पोचली तिच्या डिप्लोमाच्या काळात! मग कुठूनतरी शोधून तिने त्यावेळची स्लॆमबुक काढली आणि वाचत बसली. मी मात्र मलाही वाचायला पाहिजे म्हणून तिला सतावत राहिलो. शेवटी तिने तो खजिना माझ्या हातात ठेवला.आणि एकेक मैत्रिणीच्या गंमतिजमति सांगायला लागली.मीही त्या विश्वाचा एक भाग बनून गेलो.घरापासून दूर राहिलेल्या पोरा पोरींना मित्रमैत्रिणी म्हणजे जीव की प्राण असतो.तश्याच याही पोरी होत्या.करीअरच्या एका विशिष्ट टप्प्यावर असल्याने यांची स्वप्नंही थोडी वास्तववादी आणि focused होती. सगळ्यांनाच पुढे इंजिनिअरींग करायचं होतं.क्वचित एखादीला अजूनही पुढे शिकायचं होतं.इंजिनिअरींगच्या वेगवेगळ्या शाखांतल्या असल्याने त्या त्या विभागातली सर्वोच्च तर काही सर्वमान्य स्वप्नं बाळगून त्याच्या मागे प्रयत्न करणार्या या मुलींचं जग खरंच खूप सुंदर वाटत होतं.त्यातच कुणा कुणाचे हळवे प्रसंग,आठवणी पुसटश्या ओळीतून प्रकट होत होत्या.कुणी लिहिल्या होत्या हळव्या चारोळ्या,तर कुणी सिनेगीतांतल्या ओळीच दिल्या होत्या आवडीच्या म्हणून! वाचता वाचता एका पानाशी आलो तर पहिली नज़र गेली तिच्या स्वप्नांवर! तिला काही म्हणता करीअर करण्यात रस नव्हता. कुणावर तरी मन जडल्यांचं स्पष्टंच जाणवत होतं.तिला खरा रस होता संसार करण्यात,तिच्या आवडत्या व्यक्तिच्या प्रत्येक आवडीनिवडी पुरवण्यात! मला हे खूपच मजेदार वाटलं म्हणून बहिणीला विचारलं तर तिने अधिक माहिती पुरवली. तिचं रितसर लग्न ठरलं होतं म्हणे आणि तोच तो तिच्या प्रत्येक स्वप्नांत झलक देत होता.ठरवून लग्न असलं म्हणून काय झालं? तसं काय प्रेम होत नाही काय? प्रेमात पडण्याचा क्षण असाही येऊ शकतोच ना! तिच्या सगळ्या आकांक्षा त्याच्याभोवतिच तर फ़िरत होत्या! त्या एका बिंदूभोवति तिची स्वप्नं फ़ेर धरतांना वाटत होती.परीक्षा संपल्यावर काहीच दिवसांत लग्न होणार होतं. म्हणजे ती आता त्याच स्वप्ननगरीत अलगद तरंगत असणार! मी तिचं पान वाचतांना उगीच तिच्या स्वप्नांत डोकावण्याचा प्रयत्न करत होतो. हसून बहिणीकडे पाहिलं तर तिच्याही चेहर्यावर हसू दिसलं.विषण्णपणे हसून तिने सांगितलं, “ लग्नानंतर काहीच महिन्यांत तिच्या नवर्याने तिला जाळून मारलं!” मला ‘काय?’ म्हणायचीही ईच्छा नव्हती.अश्या कथा मी ऐकलेल्या होत्याच आणि जवळपास पाहिल्याही होत्या,त्यामुळे असं होऊ शकतं,यात मला खूप आश्चर्य नव्हतं. वयाच्या नवव्या दहाव्या वर्षीही मुलीच्या अश्याच प्रकारे जाण्याने उध्वस्त झालेलं कुटूंब मी पाहीलं होतंच!पण तिच्या बाबतित हे का झालं असावं? बहिणीलाही माहीत नव्हतं!पाच दहा मिनिटांत तिने लिहिलेलं स्लॆमबुक वाचून मला तिच्याविषयी वाईट वाटत होतं. तिच्या मैत्रिणींना काय वाटलं असेल पहिल्यांदा हे ऐकून?काय धक्का बसला असेल त्यांना?कुठेतरी त्यांच्याही स्वप्नांना तडा गेलाच असेल ना! साधं संसाराचं स्वप्नंही पुरं न होण्यासारखं असं काय बरं केलं असेल तिने? मी तेव्हा तिचं नावही वाचलं नाही. पण त्याने काय असा फ़रक पडणार आहे. नाव काहिही असू शकतं तिचं! अश्याच काही घटना विनाकारण आठवत राहिल्या आणि ती रात्र वाईटच गेली. रात्रिलाही स्वप्नांची भीती वाटली असणार!

आता प्रत्येक वेळी स्लॆमबुक म्हंटलं की हीच गोष्ट आठवत राहते.इतका सुंदर खजिना डागाळलेला वाटतो.्स्लॆमबुक !काही अधुर्या स्वप्नांचा खजिना!

Tuesday, January 17, 2006

आसक्त माझं मन...
उत्तररात्री कुणीच नाहीसं पाहून
हळूच स्वप्नात गुंगून जातं

कधीही न मिळणारी क्षितिजं
स्पर्शून येतं..

कालही वेडं बिचकत बिचकत
थोडं भटकून आलं..

तुला कळलही नसावं,
तुलाच तर स्पर्शून आलं...

Monday, January 2, 2006

रिमझिम गिरे सावन

रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
पावसाचे दिवस... सतत झिरमिर कोसळणारा पाऊस... आपल्या प्रेयसाचं सोबत असणं आणि तश्या वातावरणात निरुद्देश्य भटकत पावसाच्या आणि प्रेयसाच्याही सोबतीचा आनंद. हा पाऊस असा कधी कोसळला नव्हता असं नाही.पण का मग याच वेळेस ही अनामिक हुरहुर... याआधीही भिजल्ये होत्ये की मी.

पहले भी यूं तो बरसे थे बादल
पहले भी यूं तो भीगा था आंचल

स्वतःलाच प्रश्न विचारणारी मौसमी चटर्जी,तिला नव्या नवलाईने मुंबई दाखवणारा आमिताभ आणि दोघांच्याही प्रेमाचा साक्षी असणारा,तिच्या मनातली भावना ओळखणारा प्रेमवेडा पाऊस!सगळ्यांनी हे गीत अक्षरशः जिवंत केलय पडद्यावर! चित्रपट आहे ‘मंज़िल’,१९७९ साली केव्हातरी आलेला. गाण्यात पुर्णवेळ पाऊस कोसळत राहतो,मुंबई दिसत राहते आणि मुंबईचा समुद्र प्रत्येक वेळ सोबत करत राहतो त्यांची आणि आपलीही.रस्तेही ओले आणि दोघेही!साडीत असणारी मौसमी आणि सूटात वावरणारा अमिताभ!प्रियकराच्या सोबत असण्याच्या कल्पनेने मोहरलेली मौसमी थोडावेळही त्याचा हात सोडतांना दिसत नाही. गाण्याची सुरवात होते गिटारीच्या स्वराने.आर.डी. सलाम तुला! किती गाणि ऐकलीत तुझी आणि प्रत्येक वेळी तुझं श्रेष्ठत्व नव्यानेच मान्य करावं लागतं.हळूच लाडीक स्वरात लता गायला लागते..

रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
भीगे आज ईस मौसम मे
लगी कैसी ये अगन
गाते कसली... लाडीक तक्रारच ती पावसाबद्दलची! तरीही ती जाळणारी हवीहवीशी भावना एकेका शब्दात हळुवारपणे उलगडत जाते.’लता काय गाते या गाण्यांत’ असं म्हणणं म्हणजे ‘आजचा सूर्यास्त अधिक मनमोहक होता’ हे सांगण्याचा प्रयत्न! ‘सुलग सुलग’ म्हणतांना किती वेगवेगळ्या पद्धतिने म्हणावं? अंतरा संपताच गिटार आणि बासरीवरचा सुंदर piece सुरू होतो.इकडे (बहुतेक) आज़ाद मैदानाच्या बाजूने दोघेही जातांना दाखवलेत.रस्त्यावरची तुरळक रहदारी चालूच असते.पलिकडे चार-पाच मजली इमारतींची रांग दिसते काही माड पावसात वार्यावर डोलत असतात.ती त्याचा हात सोडत नाहीच!मग समुद्र,फ़ेसाळलेला,उधाणाला आलेला! त्याच्या लाटा नरीमन प्वाइंटच्या रस्त्यावर आणि कठड्यावर आदळतांना दिसतात.(मला एरवी न आवडणारी)मुंबई खरंच आवडून गेली मला या गाण्यात!(अशीच आवडते ती ‘साथिया’ मध्ये.) अमिताभला काहीबाही दाखवत असते मौसमी आणि तोही माहीती पुरवत असतो. पहले भी यूं तो बरसे थे बादल पहले भी यूं तो भीगा था आंचल हा असा पाऊस बहुतेक आजच कोसळतोय.मी अशी भिजल्ये होत्ये कित्येकदा;पण आज त्यालाही किती कोसळावं ते कळत नाही आणि मलाही किती बोलू आणि किती नाही असं झालय!ंमौसमी अखंड बडबडत असते.काय बोलते त्याला महत्व कुठेय?कितिदा भिजूनही हे भिजणं कित्ती वेगळं आहे. लताचा एक आलाप जणु जुन्या पावसाच्या आठवणी जागवतो.

अबके बरस क्यू सजन
सुलगसुलग जाये मन

का रे प्रिया यावेळेस हा पाऊस असं काय घेऊन आलाय? ईस बार सावन दहका हुआ है ईस बार मौसम बहका हुआ है हा पाऊसच दाहक झालाय.बहुतेक सगळा निसर्ग वेडावला आहे.हा वाराही कसा झिंगल्यासारखा वाहतोय.हे असं का झालय मलाही?तू माझ्या सोबत असण्याचा तर हा परीणाम नसावा?माझ्यावरही आणि या सगळ्या निसर्गावरही? जाने पीके चली क्या पवन सुलगसुलग जाये मन कोण दिग्दर्शक आहे माहीत नाही पण त्याच्या ताकदिचा अंदाज़ एकाच गाण्यात येऊन जातो.हळुवार भावना नेमक्या आणि सोप्या शब्दांत मांडणार्या कविवर्य योगेश यांना तर लाखो सलाम! ‘रजनीगंधा’ लिहून जाणारे योगेशच हे असलं लिहू शकतात. अमिताभ आणि मौसमी यांच्याबद्दल तर काय बोलावं? अल्लडपणे मौसमी रस्त्यालगतच्या कठड्यावर चालत राहते.अमिताभ तिला आधार देत सावरत राहतो.नाहीतरी त्यानेच तर वेडावून टाकलय ना तिला! गाणं संपता संपता दोघही एका बाकावर बसतात.त्याच्याकडे पहात त्याचा शब्दनशब्द मनात साठवत ती सगळा दिवस आठवत असल्यासारखी वाटते.मध्येच चेहर्यावरचे चुकार केस बाजूला सारते,पाण्याचे काही थेंब पुसून काढते.त्याच्या खंद्यावर मान टेकवलेलीच असते.बाजूला समुद्र फ़ेसाळत राहतो,वरून पाऊस कोसळत राहतो

भीगे आज ईस मौसम मे
लगी कैसी ये अगन

(या गाण्याआधी आणि नंतर काय आहे,काय होतं किंवा चित्रपटाची कथा काय आहे,मला माहीत नाही.निव्वळ एक गीत म्हणून कोणत्याही कथानकाशिवाय मी त्याकडे पाहतो.)