Saturday, April 15, 2006

गोव्यातून बावड्याला जायचं म्हणजे सावंतवाडी-कणकवली-तळेरे असा मार्ग आहे.तळेरे पर्यंत हा मुंबई महामार्ग असल्याने खूप दिवसांपासून विसरून गेलेलं सुसाटणं मला आज अनुभवायचं होतं.हाताशी ऍव्हेंजर असल्याने बांदा येईपर्यंत अगदी सुसाट सुटलो.सावंतवाडीच्या अलीकडे इन्सुलीचा घाट लागतो.हा आमच्या प्रवासातला पहिला घाट! यातच गाडीची क्षमता कळून चुकली.मग काय ८०-९० चा वेग म्हणजे अगदी गल्लित असल्याप्रमाणे गाठला!हा घाट चढताच हवेत उष्मा जाणवू लागला.सावंतवाडीला पोचलो तोच गावात वळण्याच्या इराद्याने. पण मामांनी आठवण करून दिली की आता योगेश(माझा मित्र)ही तिथे रहात नाही.अगदी खट्टू होऊन मोतितलावाच्या काठाने चालू लागलो.सहा-साडेसहाची वेळ असल्याने वाडीकर फ़ेरफ़टक्याला निघालेले.तलावाला तसंच मागे सोडून जाववेना.मग काठाशी असणार्या पॉम्पस या रेस्टॉरंटमध्ये जरा कॉफ़िपान उरकण्यासाठी थांबलो.नजरेच्या एका टप्प्यात येणारा मोतितलाव पाहतांना कितितरी आठवणी जाग्या झाल्या.माझ्यासाठी सावंतवाडी म्हणजेच मोतितलाव,असा अर्थ आहे.तलावाभोवताली पसरलेला वाडीचा विस्तार,त्याला मर्यादित करणारे डोंगर,त्यातलाच एक नरेंद्र डोंगर,त्याच्या शिखरावर जातांना लागणारं अरण्य,शिखरावरून दिसणारं टुमदार सावंतवाडी आणि तलावाकाठी सूर्यास्ताच्या जोडीने केलेल्या गप्पा..... एवढं सगळं किती क्षणांत समोर यावं? मनाला मर्यादा नसतात हे मात्र खरं!परत यायला कधी जमेल माहीत नाही.अगदी निःशब्दतेने पुढचं मार्गक्रमण सुरू झालं.आपसूकच वेग कमी झाला.एव्हाना सूर्यास्त झाल्याने जड वाहानांनी रस्त्याचा ताबा घ्यायला सुरवात केली होती.त्यांचे हेडलाईट अगदी वैताग आणतात.त्यातच कोकणातले रस्ते अगदी वळणावळणांचे!आमचं पहिलं लक्ष्य होतं नापणे येथिल बारमाही धबधबा.त्यामुळे गगनबावड्याला सरळ न जाता रात्री कणकवलीतच मुक्काम ठोकायचं ठरलं.कण्कवलीच्या अलीकडेच एक चांगलसं हॉटेल पाहून तिथे उतरायचं ठरलं.जेऊन झाल्यावर एक फ़ेरफ़टका मारला.तिथेच एक शांत मंदीरात थोडा वेळ शांत बसलो.अविरत वाहणार्या रस्त्याकाठीही इतकी शांतता लाभू शकते.अंथरुणात पडताच झोप लागेल इतकं दमूनही झोप न लागणे याला काय म्हणावे?झोपेची आराधना करत असतांना केव्हातरी उशीरा झोप लागली.

No comments: