Monday, June 5, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदीयाळी...

रजनीगंधाने या खेळात Tag करायला एक महीना उलटून गेला आणि पुस्तकांच्याबद्दल लिहायचे सारखे राहून जातेय.असेच होते... एखाद्या गोष्टीबद्दल खूप काही बोलायसारखे असले की ऐनवेळि शब्दच अपुरे पडतात किंवा सुचतच नाहीत! अगदी सहजच आठवायची म्हतलिइ तरी कितीक पुस्तकं डोळ्यासमोर येऊन जातात.एकाबद्दल लिहायचं म्हटलं तर दुसरं नक्कीच रुसणार!काही पुस्तकं एखाद्या शिक्षकाप्रमाणे भेटली,खूप काही शिकवून-समजावून गेली.काही अगदी सवंगड्याप्रमणे गळ्यात हात टाकत आपली गंमत सांगत राहिली.काही वेड्यासारख्या कथा सांगता सांगता हसवून गेली तर काही करूण-काव्य सांगताना रडवून गेली!काहींनी युद्धाच्या कथा सांगतांना अंगातळं रक्त सळाळून गेलं तर कधी त्यातलीच करुणा वाचून मन हेलावून गेलं.प्रत्येकाची वेगळी शैली,प्रत्येकाची वेगळी कथा आणि वेगळी तऱ्हा!
म्हणूनच एकाबद्दल लिहितांना दुसऱ्याला राग येणार तर नाही ना अशी भीती वाटते.पण नाही येणार त्यांना राग तसा.. आणि आलाच तर आपल्याच माणसाच्या रागाचे काय ईतके? एक हाक मारली तर गाल फ़ुगवून जवळ येतील आणि पुन्हा तोच प्रेमसंवाद चालू होईल.. तर.......

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
मी एका वेळी दोन तरी पुस्तके वाचत असतो त्यामुळे...
माणूस आणि झाड ले. निळू दामले आणि अवघाची शेजार- राणी दुर्वे

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
इथे एकाबद्दलच लिहितो:माणूस आणि झाड:जेमतेम नव्वद पानांचं हे पुस्तक.. मुखपृष्टापासुन मनात ठसतं.आपण पुस्तकात काय वाचणार आहोत हे सांगणारं इतकं सुन्दर मुखपृष्ट मला तरी दुसरं आठवत नाहिये सध्या!लहानपणापासून आपण इतकी झाडं पाहतो की ्त्यांच्याविषयी वेगळा विचार कधी होतच नाही.आई,बाबा,भावंड यांच्याविषयी आपण जितके आश्वासक असतो तितकेच या झाडांबद्दलही! त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याविशयी गप्पा मारायच्या राहूनच जातात! निळू दामलेंनी या सृष्टीची आपल्याला असलेली ओळख अधिक दृढ करून दिलीय या पुस्तकाद्वारे!इतकी की आपल्या गप्पा अजून रंगतील आता झाडांसोबतच्या!कुठेही काही वैज्ञानिक सिद्धांत माडतोय असला अभिनिवेष नाही की कठीण शब्दांचा अडसर नाही.झाडांबरोबरच्या आपल्या नात्याप्रमाणेच अगदी साधी सरळ ओघवती भाषा!एकाका मित्राची ओळख करून दिल्याप्रमाणे एकेका भागाचं सुंदर वर्णन आणि अलगद त्याच्या अंतरंगात डोकावणे.. इतकी सुंदर त्यांची भाषाशैली आहे.मी वर्नन करन बसण्यात अर्थ नाही.झाडासारख्या मित्राची नवीन ओळख करून देनारं हे पुस्तक स्वतःच अनुभवायची चीज़ आहे!

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१)म्रुत्यंजय-अगदि कुमारवयात वाचलेले हे पुस्तक नंतर अनेकदा वाचले.प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या कारणांनी आवदत गेले.वृषालीची कर्णाशी पहिली भेट तर कायम लक्षात राहिल अशीच आहे.शेवटच्या प्रकरणात अश्रू आवरणं अवघडच आहे.

२)राजा शिवछत्रपती-शिवचरित्रात हरवून गेलेल्या माणसाने लिहिलेले हे चरित्र आपल्याला वेड न लावेल तरच नवल!सर्व इतिहास माहीत असूनही प्रत्येकदा आणि पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा आणि शिवरायांबद्दल आदर,भक्ती,प्रेम पुनःपुन्हा वाढवणारा हा इतिहास तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही 'करंटे' आहात! आई भवानीला साकडं घालणारं पहिलं प्रकरण अंगावर अक्षरशः काटे आणतं!

३)स्मृतिचित्रे- एकासाध्या सरळ गृहिणीने तिच्या साध्या सरळ भाषेत सांगितलेली स्वतःची कथा!कधी गंमतिने हसवून तर कधी मन हेलावणऱ्या प्रसंगानी डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही!जगणं किती सोपं करता येतं हे शिकायचं असेल तर वाचायलाच पाहिजे हे पुस्तक!

४)तळ्यांतल्या साऊल्या- मी पुस्तकांबद्द्ल लिहितोय आणि कवितांबद्दल एक शब्दही नाही,हे होणे नाही. पुरुषोत्तम पाटील या माणसाचे दोनच काव्यसंग्रह आतापर्यन्त प्रसिद्ध आहेत,त्यातला हा पहिला!अगदी साध्या शब्दांतल्या आणि लयीतल्या त्यांच्या कविता कितिही वेळा वाचल्या तरी मन भरत नाही!त्यांच्या कविता वाचल्यावर उमताणऱ्या प्रतिक्रिया केवळ अश्याच असतात..... 'अशक्य लिहितो हा माणुस','महान','काय पण शब्द वापरतो हा माणुस'...
'ओठांशी थेंबला चन्द्राचा उद्गार,हातघाई झाला मदालस वार' असले लिहिणारा हा माणूस तितका प्रसिद्ध नाही याचे मात्र वाईट वाटते.पुन्हा इतक्याच कवितांवर तहान भागत नाही हेही खरेच!

५)लंपन ची पुस्तके: प्रकाश नारायण संत... चारच पुस्तकं लिहून मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण करणारा लेखक! लंपनचा खट्याळपणा,त्याला होणारे निरनिराळे भास,त्याचं भावविश्व.. सगळं वाचून आपल्याही घश्यात काहीतरिच होऊ लागतं,हेच या लेखनाचं यश.यातली 'शारदा संगित' ही कथा तर वेड लावते मला!तुम्हीही वाचून वेडे व्हाच!

कितिक पुस्तकं समोर उभी राहून 'माझ्याविषयी लिही ना रे!' म्हणुन मागे लागली आहेत.पुलंचा सगळाच 'गोतावळा' आवडतो.वपुंची 'महोत्सव,तू भ्रमत आहासी वाया,ही वाट एकटीची,अशी अनेक पुस्तकं आहेत.अजूनही उल्लेखनिय म्हणजे प्रतिभा रानडे यांचं 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'!विविध विषयांवर एका विदुषीशी मारलेल्या गप्पा किती काय देऊन जातात.

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१)समिधा-साधना आमटे
२)गोईण-राणी बंग
३)शाळा-मिलिंद बोकील
४)समग्र मीना प्रभू
५)संभाजी-विश्वास पाटील

५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
पूर्वी लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत राणी दुर्वे यांचं एक सदर येत असे,'शेजार' म्हणून!त्यातिल लेखांचं संकलन असलेलं पुस्तक म्हणजेच 'अवघाची शेजार'! कोनत्याही पानापासून कसेही वाचत रहावे आणि नवल करावे या विविध शेजारांचे आणि ते अनुभवणाऱ्या राणी दुर्वे यांचे! माणसांची आवड,नवनव्या अनुभवांची आवड,ट्रेकींगची आवड,कवितांची आवड या समान धाग्यांमुळे त्यांनी लिहिलेलं मनात अलगद उतरतं!शेजार इतका मर्यादित canvas घेऊन किती सूदर चित्र रेखाटावं!एकेक शेजार म्हनजे एकेक समृद्ध अनुभव आहे यातला! मग ती ग्लोरीया असो की बिळातले शास्त्रिबुवा,गचागच भरलेला लेडिज डाब्यातला अडाणी बायकांचा शेजार असो की अजून कुणाचा.. असा रंगतो हा शेजार की बस्स!त्यांचं लेखन मला शांता शेळके,अरुणा ढेरे यांच्या घराण्यातलं वाटतं... जीवनावर भरभरून प्रेम करणारं आणि तितक्याच त्रयस्थपणे त्याकडे पाहणारं!
गंमत अशी की खूप जणांना या पुस्तकाविष्यी माहीत नाही असं दिसलं.पण आता माहीत झालं आहेच तर एकदा डोकावून पहा या 'शेजारात' आणि त्यातलेच होऊन जा!

3 comments:

गिरिराज said...

Moderator manDaLinchaa traas he kaaraN kase vaaTate? :P

archana said...

yes... meech tee.. tujha blog masta ahe.. wel kadhun sagla wachayla hawa....

Anonymous said...

ho mi vachalay shejar mast ahe.
tyanantarhee tya eka sadarat lihayachya 'svachchhand' kee asa kahitari tyacha nav hota tehi masta hota.

~GD