Showing posts with label असेच... Show all posts
Showing posts with label असेच... Show all posts

Monday, August 11, 2008

सलाम अभिनव बिंद्राला!!!

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच
बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर
कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे
बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले
इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक
सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.
श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी
प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. चीनच्या गतविजेत्या आणि यावेळेच्या रजतपदक विजेत्या झू
किनान च्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. क्षण आला अभिनव बिंद्राच्या पदक प्रदानाचा! पण पठ्ठ्या
अगदी शांत आणि संयमी निघाला. ज्या अविचलतेने त्याने शेवटचा शॉट घेतला त्याच शांतपणे त्याने
पदकाचा स्वीकार केला. आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू
झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू
लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!
आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले
होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही
कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न
करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही! जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक
मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा
वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते. आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना
तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील. सलाम अभिनव बिंद्राला!

Sunday, April 29, 2007

बहावा आणि दोन छोटुले...

दिनेश यांचे http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=940700#POST940700 हे लिखाण वाचून बहावा आठवला. माझ्या जीवनात(??? हे हे हे! काहीही म्हणतात लोकं ना!!!) बहाव्याचा संदर्भे आला तो 'आला शिशिर संपत'या कवितेत.. त्यातला 'बहाव्याने जेथे तेथे सोनतोरण बांधिले' ले पहायला मला वयाची २४ वर्षे वाट पहावी लागली. भारत संचार निगमच्या नागपूरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये बहाव्याचं पहिलं दर्शन झालं. तेव्हा ते सोनतोरण पाहूनही तो बहावा आहे हे लक्षात आलं नाही.त्यासाठी पुन्हा ३ वर्ष जावी लागली आणि दिनेशशी ओळख व्हावी लागली.गोव्यात असतांना सुटीच्या दिवशी ते माझ्या घरी आले की निरुद्द्येश्य अशी अगदी रमत गमत भटकंती व्हायची आमची! त्यात गप्पा मारतांना झाडा-पानांपासून तर लावणी-नाट्यसंगितापर्यंतच्या विषयांवर ते बोलत रहायचे आणि मी ऐकत रहायचो. अश्याच एका भटकंतित माझ्याच घरासमोर असलेला आणि मला आवडत असलेला तो वृक्ष बहावा आहे हे त्यांनीच सांगितलं. तेव्हा कुठे मला 'सोनतोरण' आणि कवितेचा संदर्भ लागला!! (येडच्यापच आहे ना मी! ) त्याच्या शेंगेतला गोड गरही त्यांनीच सांगितलं म्हणून खाऊन पाहिला तर खूप आवडला.

तर हा असा बहावा,त्यांच्या उपरनिर्देशित लेखामुळे पुन्हा आठवला! ( आता २ वर्षांनंतर!) माझ्या घराच्या बाजूलाच असलेल्या बंगल्यात अगदी फुलून आलेला दिसला.फ़ोटो काढायचाच असे ठरवून शनिवारी आत शिरलो.बंगल्यात मालक राहत नाहीत पण कधी मधी येत असतात त्यामुळे केअर टेकर कुटुंबे तिथेच आऊट-हाऊस मध्ये राहतात.त्यांना विचारायचं म्हणुन त्यांच्या घराजवळ जाऊन आवाज दिला तर त्या बाई आणि त्यांची दोन छोटुली बाहेर आली.मुलगा ६-७ वर्षांचा तर मुलगी ३-४ वर्षांची असावी.मी फ़ोटो काढू का म्हटले तर त्या थोड्या घाबरून 'कशाचे?का?काय करणार त्याचे?' म्हणून विचारू लागल्या. मी त्यांना सांगितले पण त्यांनी रिस्क न घेता सासूबाईंवर निर्णय टोलवला.मी सांगितले की बंगल्याचे फ़ोटो घेणार नाही फ़क्त झाडाचे घेईन आणि तुम्हाला दाखवीन मगच् तुम्ही म्हणाल तर सेव्ह करीन.आणि फ़ोटो काढण्यासाठी झाडाजवळ जाऊ लागलो.तर हा छोटा मुलगा आईच्या मदतीला धाऊन आला आणि जोरजोरात आजीला बोलावू लागला.वर मला म्हणतो की थांबा आजी म्हळाली तरच काढा म्हणून! मला त्याची गंमत वाटली.तितक्यात आजी बंगल्यातले काम ताकून बाहेर आल्या आणि त्यांनीही सूनबाइंप्रमाणेच प्रश्न विचारले.त्यांनाही उत्तरे दिली पण त्याही थोड्या साशंक दिसल्या.मीमुलाकडे पाहून याचेही फ़ोटो काढतो म्हटल्यावर पोराने आजी आणि आई दोघींना न जुमानता फ़ोटो काढा म्हणाला. काहिका असेना,मला फ़ोटो काढायला परवानगी देणारे 'छोटे सरकार' अगदी उत्साहात आले आणि बहीणीला चड्डी घालून ये म्हणून फ़र्मावले. झाडासोबत दोघांचे एक दोन फ़ोटो काढून लगेच त्यांना दाखवले तर त्या बाबाचा हट्टच सुरू झाला. एकामागून एक लोकेशन्स शोधून इथे फ़ोटो काढा,तिथे फ़ोटो काढा म्हणू लागला. एक फ़ोटो चिंचेच्या ढिगाऱ्याजवळ,दुसरा सायकलवर,तिसरा हसतांना,चवथा बोलत असतांना अजून एक कमरेवर हात ठेवून असे बरेच फ़ोटो काढावे लागले.मला कटायचे होते पण त्याचा उत्साह संपेना. वरून प्रत्येक फ़ोटो काढला की बहीणीला,आईला,आजीला दाखवावा लागे! शेवटी डोळे वटारून उद्या येतो परत म्हणून सांगितले तेव्हा स्वारी थोडी मऊ झाली!या सगळ्या प्रकारात बहाव्याचे (माझ्या दृष्टीने) चांगले फ़ोटो मिळालेच पण दोन येडच्याप पोरांशी ओळख झाली म्हणून खूपच आनंद झाला!त्या बंगल्यात भरपूर झाडं आहेत. आता एकेकाच्या बहराच्या काळात झाडांचे आणि पोरांचेही फ़ोटो काढत जाईन!

तर असे हे बहावा फ़ोटो पुराण दोघा छोट्यांच्या फ़ोटोने सुफ़ळ संपूर्ण!!! :)

Friday, January 19, 2007

सध्याची माझी स्थिति-परीस्थिति अशी आहे:

वेळ मिळेना कशाचसाठी
आठवत राही तिचेच हसणे
जाई सारा वेळ खरे तर
सोसत हसण्या आधीचे रुसणे!

Wednesday, December 20, 2006

यार ने कैसी रिहाई दी है....

एकच एक माणूस तुम्हाला कधी खूप वेगवेगळ्या रुपात भेटलंय का?मला माणूस नाही पण गुलज़ारचे एकाच गज़लेतले दोन शेर खूपदा वेगेवेगळ्या पद्धतिने आणि वेगवेगळ्या रुपात खूपदा भेटले आहेत. प्रत्येक वेळी त्यांचा संदर्भ अगदी आसपासच्या उदाहरणाशी जोडून आला आणि अगदी थक्क व्हायला झालं;प्रत्येकदा!!

जिसकी आँखों मे कटी थी सदीयाँ
उसने सदीयों की जुदाई दी है!

एकाच शब्दाला फ़िरवून अर्थ बदलून टाकण्याची गुलज़ारची हातोटी यातही बघायला मिळते.कुणाची तरी वाट पहात रहावं आणि त्याने कधी येऊच नये... म्हणाल तर तो प्रियकर असेल,प्रेयसी असेल,विकासाचा किंवा आशेचा किरण असेल.... डोळ्यांत प्राण आणून वाट पहात रहावं.. वेळही कळू नये किती गेला या वाट पाहण्यांत आणि येणाऱ्याने येऊच नये.......
-----------------------------------------------------------------------------------------------

दुसरा शेर तर खूपदा भेटतो.. प्रत्येक वेळी हसून निघून जातो....

फ़िर वही लौट के जाना होगा,
यार ने कैसी रिहाई दी है....

बघा आठवून असे कित्येक प्रसंग असतिल... तेव्हा वाटतंच वाटतं..

यार ने कैसी रिहाई दी है......

Thursday, November 23, 2006

सध्या मला अगदी पोटभरुन कंटाळा आलाय.अश्या वेळी काहीही करायचे म्हटले तरी त्याचाही जाम कंटाळा येतो.पिक्चर बघायचाही कंटाळा येतो,पुस्तक वाचायचाही कंटाळा येतो;अगदी जेवायचाही कंटाळा येतो.पण आता घरी असल्याने जेवावे लागतेच.. नाहीतर आई तिची धमकी खरी करून दाखवू शकण्याची भीती असतेचे-माझ्यामुळे वाया जाणारा स्वयंपाक माझ्या डोक्याला चोपडून देईन म्हणते.... अश्या कंटाळ्यात काय करायचे म्हणुन मी खूप दिवसांपासून ढुंकूनही न पाहीलेला माझा हा blog लिहायचा प्रयत्न करतोय.मागच्या २ तासांत मी एक ओळ लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि ती तशीच अर्धवट सोडून इकडे वळलो.आता मला किमान आठवडाभर तरी सुटी घ्याविशी वाटतेय आणि मस्तपैकी दुचाकीवरून भटकावेसे वाटतेय.पण जर सुटी घेऊन घरी राहिलो तर मला घरातली अतिशय फ़ुटकळ काम मह्त्वाची म्हणुन मला करायला लावली जातील.त्यात लेटर बॉक्स भिंतीवर लावणे हे अतिशय अवघड कामही मला करावे लागू शकते.त्यापेक्षा सुटीमध्ये पळून जाणे किंवा सुटीच न घेणे हे उपाय आहेत.सध्या तरी सुटी न घेणे चालू आहे.पुढच्या महीन्यात पळून जाणे हा उपाय अंमलात आणता येतो का हे पहावे लागेल.सध्या पळून जाता येईल अशी (होणारी)बायकोही आहे.पण ती एक पात्र आहे.लग्न होणारच आहे तर पळून का जायचे म्हणते!मग एकटेच पळुन जावे लागेल असे वाटतेय.पण तरी एक अडचण आहेच.. आठवडाभर ती भेटली नाही तर कसे होईल अशी भीती वाटतेय.पण मला माहित आहे,एकदा मी निघालो की कही असे होणार नाही.पण सध्या मनात आहेच की ते!आता काय करायचं?

बरं! माझी टेन्शनं तुम्ही का म्हणुन घेतात... मला आता लिहायचा कंटाळा आलाय! तेव्हा भेटू पुन्हा.. तोपर्यंत... हरी हरी!