Thursday, November 23, 2006

सध्या मला अगदी पोटभरुन कंटाळा आलाय.अश्या वेळी काहीही करायचे म्हटले तरी त्याचाही जाम कंटाळा येतो.पिक्चर बघायचाही कंटाळा येतो,पुस्तक वाचायचाही कंटाळा येतो;अगदी जेवायचाही कंटाळा येतो.पण आता घरी असल्याने जेवावे लागतेच.. नाहीतर आई तिची धमकी खरी करून दाखवू शकण्याची भीती असतेचे-माझ्यामुळे वाया जाणारा स्वयंपाक माझ्या डोक्याला चोपडून देईन म्हणते.... अश्या कंटाळ्यात काय करायचे म्हणुन मी खूप दिवसांपासून ढुंकूनही न पाहीलेला माझा हा blog लिहायचा प्रयत्न करतोय.मागच्या २ तासांत मी एक ओळ लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि ती तशीच अर्धवट सोडून इकडे वळलो.आता मला किमान आठवडाभर तरी सुटी घ्याविशी वाटतेय आणि मस्तपैकी दुचाकीवरून भटकावेसे वाटतेय.पण जर सुटी घेऊन घरी राहिलो तर मला घरातली अतिशय फ़ुटकळ काम मह्त्वाची म्हणुन मला करायला लावली जातील.त्यात लेटर बॉक्स भिंतीवर लावणे हे अतिशय अवघड कामही मला करावे लागू शकते.त्यापेक्षा सुटीमध्ये पळून जाणे किंवा सुटीच न घेणे हे उपाय आहेत.सध्या तरी सुटी न घेणे चालू आहे.पुढच्या महीन्यात पळून जाणे हा उपाय अंमलात आणता येतो का हे पहावे लागेल.सध्या पळून जाता येईल अशी (होणारी)बायकोही आहे.पण ती एक पात्र आहे.लग्न होणारच आहे तर पळून का जायचे म्हणते!मग एकटेच पळुन जावे लागेल असे वाटतेय.पण तरी एक अडचण आहेच.. आठवडाभर ती भेटली नाही तर कसे होईल अशी भीती वाटतेय.पण मला माहित आहे,एकदा मी निघालो की कही असे होणार नाही.पण सध्या मनात आहेच की ते!आता काय करायचं?

बरं! माझी टेन्शनं तुम्ही का म्हणुन घेतात... मला आता लिहायचा कंटाळा आलाय! तेव्हा भेटू पुन्हा.. तोपर्यंत... हरी हरी!

Wednesday, October 18, 2006

Sweet Romance


गाण्यांच्या बद्दल लिहायचं म्हटलं की शब्द आपसूकच मदतीला धावून येतात.पण ज्यात शब्दच नाहीत अश्या एखाद्या Instrumental Piece बद्दल काय लिहावे हेच सुचत नाही.आपल्या भारतात मुळातच संगित म्हटले की चित्रपटसंगित नजरेसमोर येतं.जर भारतिय शास्त्रिय संगिताबद्दल अगदीच अंधार असेल तर वाद्यसंगित कुठून माहीत होणार!काही वर्षांपूर्वी अगदीच नादावलेल्या वयात एकदा दुकानात असाच TP करत असतांना त्या वयाला भुलावणाऱ्या नावाची एक cassette दिसली. Sweet Romance! कव्हरवरच्या सुंदर प्रकाशचित्रानेही मन मोहून घेतलं!cassette उचलून पाहिली तर त्यातल्या sweet romance या एका गाण्याने एक आठवण जागवली.शेखर सुमनच्या Movers & Shakers या कार्यक्रमात पं.शिवकुमार शर्मा यांच्या मुलाची म्हणजेच राहुल शर्माची मुलाखत घेतली होती.कार्यक्रम संपताना त्याने ह्याच गाण्य्यातला(?) छोटासा भाग संतूरवर वाजवून दाखवला होता.अगदी captivating वाटला होता मला तर! लगेच cassette घेतली.अश्या खरेदीची गंमत अशी की मला लगेच ती ऐकायची असते. कपडे खरेदी असेल तर घरी जाताच ते वापरायचे असतात.कधी कधी तर मी दुकानातूनच असे कपडे,चपला तश्याच घालून निघतो.त्यावेळी माझ्याकडे एक डबडा टेप होता.पण त्यावरही काम भागत असे.टेपवर Reverse / Forward काम करत नसेच.दुसऱ्या ्बाजूच्या असलेले sweet romance ऐकण्यासाठी पूर्ण cassette हाताने forward करावी लागली.बी साईडला प्रथम येते ते 'मेला'! टिपिकल गावच्या जत्रेवरून कम्पोज़ केलेलं हे गाणं अगदीच ताल धरायला लावतं.मात्र मला नंतर काही कामामुळे थोडा वेळ बाहेर जावं लागलं.संध्याकाळी परत येताच पहिलं काम पुन्हा कॅसेट ऐकणं.धुळ्यासारख्या ठिकाणची हिवळ्यातली सरती संध्याकाळ!खूपच गारवा हवेत होता.मी दूध गरम करून त्यात मस्तपैकी नेसकॅफ़े टाकून पुन्हा टेप लावून बसलो.अश्या वेळी अगदी मंद प्रकाशात संगित ऐकायला मला जाम आवडतं.पुढचं कम्पोज़िशन होतं Remembering Her!याची सुरवात होते अतिशय विरही स्वराने.उगाच कुणाची तरी आठवण आल्यासारखं मलाही वाटू लागलं.आवाज जरा मोठा करून मी बाहेरच्या ओट्यावर येऊन बसलो.आजूबाजूला अगदीच शांतता होती.थंडीमुळे कुणी बाहेरही पडत नसतं.अश्या वातावरणात संतूरचे सूर अधिक आत घुसत गेले.एका आर्त नोटवर ते कम्पोज़िशन संपले.दोन ट्रॅकमधली रिकामी जागा खूप लांबली असल्यासारखी वाटू लागली.आणि अचानक त्याच संतूरचे अतिव आनंदी स्वर कानावर पडले.संध्याकाळच्या वेळी आपल्या प्रिय माणसाची वाट पहात बसावं.माहीत असावं की ते माणुस येणार नाही.आणि अचानकच त्याचं येणं व्हावं.तीच भावना होते Sweet Romance हा ट्रॅक ऐकतांना.remembering her सारख्या उदास ट्रॅकनंतर आल्याने sweet romance अधिकच प्रभावी होते.संतूरचे स्वर खरं तर मला खूपच आवडतात.त्यात का कुणास ठावूक एक खूप मोकळेपणा वाटतो.सनई एका अर्थाने दुःखाचे प्रतिकात्मक स्वर घेऊन येते.त्याच्या अगदी उलट म्हणजे उत्कट आनंदाचे स्वर असणारे संतूर!(अर्थातच या माझ्या स्वतःच्या समजुति आहेत.)हा आनंद संयत असा नसतो तर अगदी नाचायला लावणारा आनंद!हिरव्यागार टेकडीवरच्या चढ-उतारांवरून पळापळ करत दमून जावे यातही एक आनंद असतो.अगदी तसेच वाटतात मला sweet romance चे स्वर! खरं तर हे नीट व्यक्तही करता येत नाही आणि शब्द नसल्याने त्याबद्दल लिहिताही येत नाही. पण खूप काही सांगावसं वाटतं.पण नाविलाज को क्या विलाज! तुम्ही ते ऐका स्वतःच!अल्ल्ड वयात तिच्या जवळपास असण्यानेही हुरळून जावे,तिच्या ओझरत्या नेत्रकटाक्षानेही हवेत उडायला लागावे,ती लाजली तर जीवच द्यावासा वाटावे,अचानक पाऊस यावा,तिने भिजत असता तिला आपल्या छत्रीत घ्यावे,तिचा ओझरता स्पर्श व्हावा,मग आपण उगाच तिच्या हाताला स्पर्श करावा,तिने लाजून चूर व्हावे आणि मग सारे जगच पावसात विरघळून गेल्यासारखे आपण दोघेच उरावे.. असाच हा पहिल्या प्रेमाचा स्पर्श.. A Sweet Romance!

Saturday, August 5, 2006

आये तुम याद मुझे...

काल किशोर कुमारचा जन्मदिवस होता.भारतिय हृदयाचा एक कोपरा कायम व्यापणाऱ्या काही निवडक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किशोर कुमार!'किशोर' इतकंच त्याला म्हणता येतं.उगीच कोणत्याही प्रकारचे आदरार्थी विशेषणं त्याला लावायची गरज नाही इतका किशोर आपला वाटतो.विविध दूरचित्रवाणि वाहिन्यांनी काल विविध कार्यक्रम सादर केलेच पण केक कापून जणू किशोर आजही आपल्यातच आहे असा उत्सव साजरा केला.आणि ते काही खोटंही नाही.आयुष्याच्या कोणत्याही वळणावर किशोरचं एखादं गीत आपली साथ करतच असतं.मग प्रसंग आनंदाचा असो,दुःखाचा असो किंवा कोणत्याही भावनेने अलिप्त असा असो.. किशोरचं गीत आठवतंच आपल्याला!पण आज मला आठवतंय त्याचंच एक गीत,'मिली' चित्रपटात अमिताभसाठी गायलेलं.. आये तुम याद मुझे.......

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन

काल सारखं हेच गीत का ओठी येत होतं कळेना.. अगदी जड आणि दर्दभऱ्या आवाजात किशोर गातो.. अमिताभ येरझऱ्या घालत गात असतांना दिसतो पडद्यावर.

जिसपल नैनों मे सपना तेरा आये
उसपल मौसम पर मेहन्दी रच जाये
और तू बन जाये जैसे दुल्हन

कवी योगेश यांची एक सुंदर कविता,साधी पण आशयगर्भ शब्दरचना आणि सचिनदेव बर्मन यांचे संगित; या सगळ्यांवर कळस म्हणजे किशोरचा आवाज़!

जब मै रातों मे तारे गिनता हूं
और तेरे कदमों की आहट सुनता हूं
लगे मुझे हर तारा ,तेरा दर्पण

सुरवातिला गोड आणि रोमॅन्टीक गाणीच किशोरच्या वाट्याला आली होति.पण पुढे जेव्हा अशी दर्दभरी गाणी त्याला मिळाली तेव्हा किशोर काय चीज़ आहे हे जगाला कळून चुकले.असंच एक 'मंज़िले अपनी जगह' किंवा 'मेरा जीवन कोरा कागज़' कायम गुणगुणायला लावणारं!

हरपल मन मेरा मुझसे कहता है
जिसकी धुन मे तू खोया रहता है
भर दे फूलोंसे उसका दामन

या गाण्यातल्या प्रत्येक कडव्याची सुरवात काहिश्या निराशेने होते.आणि मग तिसरी ओळ येते तेव्हा एका स्वप्नजगतात नेणारा आशावाद प्रतित होतो.'जब मै रातों मे..' म्हणतांनाचा किशोरचा आवाज आणि शेवटी 'लगे मुझे हर तारा,तेरा दर्पण' म्हणतांना प्रत्येक भावना जगणारा किशोरचा आवाज, जादूई आहे हेच पुन्हा प्रतित होते.गायनातले कोणत्याही प्रकारचे formal शिक्षण न घेतलेला किशोर हे जे करतो त्याला दैवी देणगीच म्हणावे लागेल.किशोरच्या आवाजातली जादू अनुभवायची असेल तर याराना चित्रपटातली दोन गाणी आवर्जून ऐकावीत.खरं तर दोन्ही गाणी पडद्यावर साकारली आहेत पुन्हा अमिताभनेच!पहिलं गीत आहे अतिशय हळूवार प्रेमगीत..."छूकर मेरे मनको"... यातला 'छूकर' कितीतरी हळूवारपणे स्पर्शून जातो.आणि हे गाणं संपत नाही तोच दुसरं गाणं सुरू होतं ते म्हणजे 'सारा ज़माना'! दोन्ही गाण्यांतला ज़मीन आसमानाचा फ़रक किशोरच्या आवाजातून किती अधोरेखित होतो!वाटतं,हळूवारपणे स्पर्शून जाणारा हाच का तो किशोर जो अगदी टपोरी ढंगात 'सारा ज़माना' म्हणतोय!

किशोरचा स्पर्श झालेली कितीतरी गाणी नुसति ऐकत रहावसं वाटतं.सहज आठवायचं म्हटलं तरी कितीतरी गाणी मनातून सरळ ओठांवर येतात.जादूच म्हणावी लागेल ही किशोरची!आज किशोर नसला तरी तितक्याच उत्साहात त्याचा जन्मदिन साजरा होतोय.पुढेही होतच राहील.पण त्याची आठवण देणारं हेच गीत पुन्हा त्याच्यासाठीच अर्पण...

आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन
खुशबू लायी पवन,महका चंदन!

Wednesday, June 21, 2006

मनी मायबोलि (माझी मातृभाषा)

(गायत्रिचा ब्लॉग वाचतांना लक्ष्यात आलं की ही बया विविध बोलिंत लिहित सुटलिय.तिने माझ्या मातृभाषेत लिहायच्या आधीच मी लिहिणं अगदी गरजेचं आहे :) )

आपला राज्याना उत्तरेकडना जिल्हा म्हन्जे धुये,नन्दुरबार,जयगांव आनि नाशिकना उत्तर भाग याले 'खान्देश' म्हन्तस.गंज (खूप) वरीस तठे (तिथे)मुसलमानी राजे लोकेस्नं राज्य व्हतं त्यानालागे (त्यामुळे) 'खान देस' असं नाव पडनं.आते या भागमा बोलतंस ती बोली म्हन्जे 'अहिराणी' खरं तं 'ऐरानी' बोली!
तिच मनी (माझी) मातृभाषा. माय बोलस ती 'मायबोली'! आमनि माय आन बाप येरायेर (एकमेकांशी)ऐरानीमाच बोलतंस आनि भांडतसबी!
मना (माझ्या) मायआजीले ते (तर) ऐरानी सोडता दुसरी भाषा येये न्हई. कानले ऐकाले गोड वाटस (वाटते) ऐरानी.खान्देस म्हन्जे त्याले गुजरात,मध्ये परदेस जोगे (जवळ)शे (आहे)!त्यानलागे ऐरानीमा मारवाडी,गुजराती आनि हिन्दीना बराच शब्दे येल शेतस.्वाक्यरचाना हिन्दिसारखी र्हास!कोन म्हनस जुना जमानामां ह्या भागवर 'अहिर' राजानं राज्य होतं.. त्यानालागे ह्या भासाले (भाषेला) 'अहिराणी' नाव पडनं.कोन म्हनस,'ह्या भागमां तव्हंय (तेव्हा) राह्येत त्या लोकेसले (लोकांना) 'अव्हेरी' (अव्हेरून) टाकेल व्हतं आन म्हनून त्यास्नी भाशा म्हन्जे 'अहिराणि' ! आते जे बी कारण व्हई ते व्हई.बठ्ठा लोके हाई भाषा बोलतंस हे नख्खी!गावम्हदार (गावांमध्ये) मराठी बोलनराले एक ते 'मास्तर' म्हनतंस न्हई ते 'दीडशहाना'!तुम्हले म्हाईतीच शे (आहे) बहिणबाई ह्या जयगांव जिल्हाना व्ह्यत्या.त्यास्न्या कविता ऐरानीम्हदारच शेतस! हा,यक शे,त्या भागमा ऐरानी जास्त मराठीसारखी र्हास.पन धुया भागमां बोलतंस ती पिव्वर ऐरानी!
आते (आता) मी ऐरानीम्हदार लिखानां संकल्प सोडेल शे,ते काय काय लिखसू याय (वेळ) जमीं तसा आन सुची तसं!

Monday, June 5, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदीयाळी...

रजनीगंधाने या खेळात Tag करायला एक महीना उलटून गेला आणि पुस्तकांच्याबद्दल लिहायचे सारखे राहून जातेय.असेच होते... एखाद्या गोष्टीबद्दल खूप काही बोलायसारखे असले की ऐनवेळि शब्दच अपुरे पडतात किंवा सुचतच नाहीत! अगदी सहजच आठवायची म्हतलिइ तरी कितीक पुस्तकं डोळ्यासमोर येऊन जातात.एकाबद्दल लिहायचं म्हटलं तर दुसरं नक्कीच रुसणार!काही पुस्तकं एखाद्या शिक्षकाप्रमाणे भेटली,खूप काही शिकवून-समजावून गेली.काही अगदी सवंगड्याप्रमणे गळ्यात हात टाकत आपली गंमत सांगत राहिली.काही वेड्यासारख्या कथा सांगता सांगता हसवून गेली तर काही करूण-काव्य सांगताना रडवून गेली!काहींनी युद्धाच्या कथा सांगतांना अंगातळं रक्त सळाळून गेलं तर कधी त्यातलीच करुणा वाचून मन हेलावून गेलं.प्रत्येकाची वेगळी शैली,प्रत्येकाची वेगळी कथा आणि वेगळी तऱ्हा!
म्हणूनच एकाबद्दल लिहितांना दुसऱ्याला राग येणार तर नाही ना अशी भीती वाटते.पण नाही येणार त्यांना राग तसा.. आणि आलाच तर आपल्याच माणसाच्या रागाचे काय ईतके? एक हाक मारली तर गाल फ़ुगवून जवळ येतील आणि पुन्हा तोच प्रेमसंवाद चालू होईल.. तर.......

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
मी एका वेळी दोन तरी पुस्तके वाचत असतो त्यामुळे...
माणूस आणि झाड ले. निळू दामले आणि अवघाची शेजार- राणी दुर्वे

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
इथे एकाबद्दलच लिहितो:माणूस आणि झाड:जेमतेम नव्वद पानांचं हे पुस्तक.. मुखपृष्टापासुन मनात ठसतं.आपण पुस्तकात काय वाचणार आहोत हे सांगणारं इतकं सुन्दर मुखपृष्ट मला तरी दुसरं आठवत नाहिये सध्या!लहानपणापासून आपण इतकी झाडं पाहतो की ्त्यांच्याविषयी वेगळा विचार कधी होतच नाही.आई,बाबा,भावंड यांच्याविषयी आपण जितके आश्वासक असतो तितकेच या झाडांबद्दलही! त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याविशयी गप्पा मारायच्या राहूनच जातात! निळू दामलेंनी या सृष्टीची आपल्याला असलेली ओळख अधिक दृढ करून दिलीय या पुस्तकाद्वारे!इतकी की आपल्या गप्पा अजून रंगतील आता झाडांसोबतच्या!कुठेही काही वैज्ञानिक सिद्धांत माडतोय असला अभिनिवेष नाही की कठीण शब्दांचा अडसर नाही.झाडांबरोबरच्या आपल्या नात्याप्रमाणेच अगदी साधी सरळ ओघवती भाषा!एकाका मित्राची ओळख करून दिल्याप्रमाणे एकेका भागाचं सुंदर वर्णन आणि अलगद त्याच्या अंतरंगात डोकावणे.. इतकी सुंदर त्यांची भाषाशैली आहे.मी वर्नन करन बसण्यात अर्थ नाही.झाडासारख्या मित्राची नवीन ओळख करून देनारं हे पुस्तक स्वतःच अनुभवायची चीज़ आहे!

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:

१)म्रुत्यंजय-अगदि कुमारवयात वाचलेले हे पुस्तक नंतर अनेकदा वाचले.प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या कारणांनी आवदत गेले.वृषालीची कर्णाशी पहिली भेट तर कायम लक्षात राहिल अशीच आहे.शेवटच्या प्रकरणात अश्रू आवरणं अवघडच आहे.

२)राजा शिवछत्रपती-शिवचरित्रात हरवून गेलेल्या माणसाने लिहिलेले हे चरित्र आपल्याला वेड न लावेल तरच नवल!सर्व इतिहास माहीत असूनही प्रत्येकदा आणि पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा आणि शिवरायांबद्दल आदर,भक्ती,प्रेम पुनःपुन्हा वाढवणारा हा इतिहास तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही 'करंटे' आहात! आई भवानीला साकडं घालणारं पहिलं प्रकरण अंगावर अक्षरशः काटे आणतं!

३)स्मृतिचित्रे- एकासाध्या सरळ गृहिणीने तिच्या साध्या सरळ भाषेत सांगितलेली स्वतःची कथा!कधी गंमतिने हसवून तर कधी मन हेलावणऱ्या प्रसंगानी डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही!जगणं किती सोपं करता येतं हे शिकायचं असेल तर वाचायलाच पाहिजे हे पुस्तक!

४)तळ्यांतल्या साऊल्या- मी पुस्तकांबद्द्ल लिहितोय आणि कवितांबद्दल एक शब्दही नाही,हे होणे नाही. पुरुषोत्तम पाटील या माणसाचे दोनच काव्यसंग्रह आतापर्यन्त प्रसिद्ध आहेत,त्यातला हा पहिला!अगदी साध्या शब्दांतल्या आणि लयीतल्या त्यांच्या कविता कितिही वेळा वाचल्या तरी मन भरत नाही!त्यांच्या कविता वाचल्यावर उमताणऱ्या प्रतिक्रिया केवळ अश्याच असतात..... 'अशक्य लिहितो हा माणुस','महान','काय पण शब्द वापरतो हा माणुस'...
'ओठांशी थेंबला चन्द्राचा उद्गार,हातघाई झाला मदालस वार' असले लिहिणारा हा माणूस तितका प्रसिद्ध नाही याचे मात्र वाईट वाटते.पुन्हा इतक्याच कवितांवर तहान भागत नाही हेही खरेच!

५)लंपन ची पुस्तके: प्रकाश नारायण संत... चारच पुस्तकं लिहून मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण करणारा लेखक! लंपनचा खट्याळपणा,त्याला होणारे निरनिराळे भास,त्याचं भावविश्व.. सगळं वाचून आपल्याही घश्यात काहीतरिच होऊ लागतं,हेच या लेखनाचं यश.यातली 'शारदा संगित' ही कथा तर वेड लावते मला!तुम्हीही वाचून वेडे व्हाच!

कितिक पुस्तकं समोर उभी राहून 'माझ्याविषयी लिही ना रे!' म्हणुन मागे लागली आहेत.पुलंचा सगळाच 'गोतावळा' आवडतो.वपुंची 'महोत्सव,तू भ्रमत आहासी वाया,ही वाट एकटीची,अशी अनेक पुस्तकं आहेत.अजूनही उल्लेखनिय म्हणजे प्रतिभा रानडे यांचं 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'!विविध विषयांवर एका विदुषीशी मारलेल्या गप्पा किती काय देऊन जातात.

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१)समिधा-साधना आमटे
२)गोईण-राणी बंग
३)शाळा-मिलिंद बोकील
४)समग्र मीना प्रभू
५)संभाजी-विश्वास पाटील

५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
पूर्वी लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत राणी दुर्वे यांचं एक सदर येत असे,'शेजार' म्हणून!त्यातिल लेखांचं संकलन असलेलं पुस्तक म्हणजेच 'अवघाची शेजार'! कोनत्याही पानापासून कसेही वाचत रहावे आणि नवल करावे या विविध शेजारांचे आणि ते अनुभवणाऱ्या राणी दुर्वे यांचे! माणसांची आवड,नवनव्या अनुभवांची आवड,ट्रेकींगची आवड,कवितांची आवड या समान धाग्यांमुळे त्यांनी लिहिलेलं मनात अलगद उतरतं!शेजार इतका मर्यादित canvas घेऊन किती सूदर चित्र रेखाटावं!एकेक शेजार म्हनजे एकेक समृद्ध अनुभव आहे यातला! मग ती ग्लोरीया असो की बिळातले शास्त्रिबुवा,गचागच भरलेला लेडिज डाब्यातला अडाणी बायकांचा शेजार असो की अजून कुणाचा.. असा रंगतो हा शेजार की बस्स!त्यांचं लेखन मला शांता शेळके,अरुणा ढेरे यांच्या घराण्यातलं वाटतं... जीवनावर भरभरून प्रेम करणारं आणि तितक्याच त्रयस्थपणे त्याकडे पाहणारं!
गंमत अशी की खूप जणांना या पुस्तकाविष्यी माहीत नाही असं दिसलं.पण आता माहीत झालं आहेच तर एकदा डोकावून पहा या 'शेजारात' आणि त्यातलेच होऊन जा!